वृत्तसंस्था/ चेन्नई
यजमान तामिळनाडू आणि मुंबई यांच्यात रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्याला येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या सामन्यात तामिळनाडूचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरत आहे. रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांच्या कामगिरीवरच तामिळनाडूचे यश अवलंबून राहील. या स्पर्धेत मुंबई संघाने आतापर्यंत सलग दोन सामने गमवले असून त्यांनी तीन सामन्यातून 6 गुण घेत गुणतक्त्यात 13 वे स्थान मिळविले आहे. तामिळनाडू गुणतक्त्यात 16 व्या स्थानावर आहे.
या सामन्यात आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ आपली पराभवाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न करेल. तामिळनाडूचे नेतृत्व विजय शंकरकडे सोपविण्यात आले आहे. रणजी स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळण्यासाठी अश्विन आपल्या राज्याच्या संघामध्ये दाखल झाला आहे. टी. नटराजन आणि साईकिशोर हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. अभिनव मुकुंद, श्रीधर राजू, कौशिक गांधी, बाबा अपराजित, बाबा इंद्रजित, दिनेश कार्तिक यांच्यावर तामिळनाडूच्या फलंदाजीची भिस्त राहील.
कर्णधार आदित्य तरे, सिद्धेश लाड, जय बिस्त, अकिब कुरेशी, शुभम रांजणे, आकाश पारकर, सर्फराज खान, मुलानी, भोईर, अत्रादे, दीपक शेट्टी, तुषार देशपांडे, लेवानी आणि डायस या नवोदित खेळाडूंचा मुंबई संघात समावेश आहे.