वृत्तसंस्था / चेन्नई :
कोरोना विषाणू संसर्गाचा हॉटस्पॉट बनलेल्या तामिळनाडू राज्यानेही महाराष्ट्रापाठोपाठ टाळेबंदीचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना रूग्णांच्या एकंदर संख्येत महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूचाच क्रमांक लागतो. येथे प्रतिदिन नव्या रूग्णांची संख्या वाढत असून त्यामुळे सावधानतेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
मात्र, टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळात निर्बंधांमध्ये काही शिथिलताही देण्यात येणार आहे. रेस्टॉरंटस् आणि चहापान दुकाने खुली करण्यात येतील. सध्या त्यांना केवळ खाण्यापिण्याची पार्सल्स देण्याची मुभा आहे. आता तेथे सामाजिक अंतराचा नियम पाळून ग्राहकांना सेवा देण्याची मुभा देण्यात येईल. तसेच एकावेळी ग्राहकांच्या बसण्याच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्के उपयोग करण्याचे बंधन असेल.
धान्य दुकाने एक तास जास्त वेळ उघडी ठेवण्यात येतील. खासगी कंपन्या आणि निर्यात उत्पादन केंद्रांना 50 टक्के कर्मचाऱयांसह काम करण्याची अनुमती देण्यात आली होती. ही मुभा आता 75 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. राजधानी चेन्नईमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या ई व्यापारासाठीही अनुमती देण्यात आली आहे. मात्र, ऑगस्ट अखेरपर्यंत शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि शैक्षणिक संस्था बंदच राहतील. चेन्नईत गेल्या काही दिवसांमध्ये रूग्णांची संख्या कमी होत आहे, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केला. तसेच कोरोना मृत्यूदर 1.6 टक्के असून तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.