प्रतिनिधी / वाठार किरोली
तारगाव ता. कोरेगाव येथील शेतकरी हायस्कूलच्या जमिनीमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाने काम करण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थांनी तो पुराव्यासह हाणून पाडला असे प्रकार जिल्ह्यात विविध ठिकाणी घडत असून जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल ,मोजणी खात्यास सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. याबाबत माहिती अशी तारगाव येथील रेल्वे स्टेशनलगत शेतकरी हायस्कूल आहे रेल्वे लाईनच्या इलेक्ट्रिक सबस्टेशनच्या कामाकरिता रेल्वे विभागाच्या पाँवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी हायस्कूलच्या हद्दीत रेल्वेची हद्द आहे म्हणून सबस्टेशनचे काम सुरू केले गावातील हायस्कूलचे माजी विद्यार्थी विकास थोरात यांना समजताच काही ग्रामस्थांसह तत्काळ त्या ठिकाणी गेले व अधिकाऱ्यांना भूसंपादनाचे रेकॉर्ड मागितली मात्र रेल्वे विभागाने तयार केलेला नकाशा त्यांना दाखविण्यात आला सदर नकाशात लोहमार्गापासून रेल्वेची हद्द एकशे पंधरा फूट दर्शवली आहे.
परंतु पूर्वीच्या हुबळी डिव्हिजनचा रेकॉर्डचा नकाशासह पुरावा अधिका-याना दाखवला त्यामध्ये फक्त एकोनपन्नास फुट हद्द असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले शासनाच्या नियमानुसार जमीन भूसंपादन केल्याशिवाय काम करू नये असे ग्रामस्थांनी सांगितले व काम थांबविण्यात आले त्यामुळे शिवारातील रस्ता व शाळेची जमिनी वाचवता आली. त्यामुळे रेल्वे विभागाचे रेकॉर्ड व शेतकऱ्यांकडील ,महसूल विभागाकडील रेकॉर्ड यामध्ये मोठी तफावत दिसत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न फार मोठी डोकेदुखी म्हणून निर्माण झाला आहे. यावेळी गावातील दत्ता माने, अशोक निकम बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
” रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध नाही परंतु लागणारी जमीन भूसंपादन करावी व शाळा व शेतकरी यांचे नुसकान होणार नाही याची दक्षता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे तसेच जिल्हाधिकारी यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा रेल्वे महसूल व शेतकऱ्यांच्या मध्ये समन्वय सधला जात नाही समन्वय निर्माण झाल्यास जिल्ह्यातील विकास कामे झपाट्याने होतील.” माजी विद्यार्थी विकास थोरात तारगाव ता. कोरेगाव जि.सातारा