प्रतिनिधी / सातारा :
पाटण तालुक्यातील तारळी धरणामुळे विस्थापीत झालेल्या धरणग्रस्तांना हक्काचे भुखंड मिळत नव्हते. प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. आमदार श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे विनंती करताच त्यांनी यामध्ये लक्ष घालून धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविला. तब्बल 21 वर्षानंतर आमदार शिवेंद्रराजेंच्यामुळे भूखंडाच्या कब्जेपट्टी व सातबारा उताऱ्याचे वाटप धरणग्रस्तांना झाले आहे, अशी माहिती धरणग्रस्तांचे गटनेते सिताराम गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, तारळी धरणाकरता जमीनीचे संपादन झाले तेव्हापासून पर्यायी जमीन, पर्यायी भूखंड कधी मिळेल याच्या प्रतिक्षेत ठोसेघर येथील यशवंत बेडेकर, परशराम गायकवाड, जयराम गायकवाड, शंकर गायकवाड, नंदा पवार, महादेव लक्ष्मण गायकवाड, संतोष जनार्दन गायकवाड, विठ्ठल रामचंद्र सपकाळ, मारुती गोरखु चव्हाण, सुंदराबाई गायकवाड यांची शेतजमिन व घरे 1999 पासून पाण्यात गेली होती. त्याकरता दोन वेळा जमीनीचे संपादन झाले. दोन वेळा धरणग्रस्तांचे संकलन करण्यात आले. 2000 सालापासून संकलन मंजूरीसाठी व 2005 सालापासून पूनर्वसन शेतजमीनकरता पाठपुरावा सुरु होता. परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजेंच्याकडे कैफियत मांडताच त्यांनी यामध्ये लक्ष घालून बनपूरी, पिंपरी, सुर्याचीवाडी, अनफळे, पळसगाव येथील संपादन शेतजमीन उरमोडी प्रकल्पाकडे वर्ग केलेली रद्द करुन घेतली. 22 वर्षानी न्याय मिळाल्याने धरणग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.