जलपर्णी त्वरित हटविण्याची मागणी
प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा तार नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात जलपर्णी वाढल्या असून संपूर्ण नदीवर त्याचेच आच्छादान आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाहही थांबला आहे. अलिकडेच जलस्त्रोत्रमंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासमवेत तेथील तपासणी करून हे जलपर्णी 10 जूनपासून हटविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप तरी याकडे कुणीही लक्ष न दिल्याने येथे पुराची भीती निर्माण झाली आहे.
दरवर्षी बस्तोडा, उसकई, पालये व गिरी भागात पूर येतो मात्र यंदा हा पूर मोठय़ा प्रमाणात येऊन त्याची झळ आजूबाजूच्या घरांना पोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही जलपर्णी त्वरित हटवावी अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे स्थानिक नागरिक प्रकाश भिवशेट यांनी जलस्त्रोत खात्याकडे केली आहे.
म्हापसा नदीतील जलपर्णी समस्या सोडविण्यासाठी जलस्त्रोत विभागाने गणेश विसर्जन स्थळापासून ते महामार्ग पुलापर्यंत तसेच मयडे पुलाच्या दिशेने असलेली ही सर्व पाण्यातील जलपर्णी काढण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम पुढच्या आठवडय़ात सुरू होणार आहे. ही घातक जलपर्णी गिरी, बस्तोडा म्हापसा तसेच हॉटेल ग्रीनपार्कपासून ते मयडेपर्यंत वाहणाऱया नदीच्या जवळजवळ संपूर्ण भागावर आच्छादनासारखी पसरलेली आहे.
या नदीतील क्षारता पातळी घटल्यानेच जलपर्णी वाढत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. त्यानुसार हळदोणचे आमदार ऍड. कार्लुस फरेरा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक होऊन तोडगा काढण्याचा निर्णय झाला होता. मध्यंतरी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनीही नदीपात्राची पाहणी केली होती. जलस्त्रोत खात्याने नदीतील जलपर्णी हटविण्यासंदर्भात दोन अंदाजपत्रके तयार केली आहेत.
प्रशासनाने ही जलपर्णी वेळेत न हटविल्यास पुराचा सामना करावा लागेल. परिणामी सरकारला संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. मात्र वेळीच आवश्यक खबरदारी घेत कार्यावाही केल्यास हा प्रकार टाळता येईल. या जलपर्णीमुळे बस्तोडा व पालयेमध्ये पूर येण्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्वरित पावले न उचलल्यास हा प्रकार पुन्हा घडेल. तसेच नदीच्या बाजूने गिरीच्या दिशेने पूरस्थिती उद्भवू शकते.