ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबाने अफगाणिस्तानवर पुर्णपणे कब्जा केला आहे. अफगाण सरकारने तालिबानी बंडखोरांसमोर गुडघे टेकले असून, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून ताजिकिस्तानचा आसरा घेतला आहे. त्यामुळे तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेऊन त्याचे नाव ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असे केले. तसेच रविवारी मध्यरात्री तालिबान्यांनी सरकार स्थापनेचीही घोषणा केली.
तालिबान बंडखोरांच्या या घोषणेनंतर जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. एवढंच नाही तर अफगाणिस्थानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणि दूतावासांतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे नियोजन सुरू केले आहे. भारतानं काबूलमधील दुतावास अद्याप बंद केलेला नाही. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नियोजन सुरू आहे. काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणली आहे.
दरम्यान, तालिबानने रविवारी काबुलमध्ये प्रवेश करुन मुख्य तुरुंग फोडले आणि 5 हजार दहशतवाद्यांची सुटका केली. यामध्ये ‘इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया’ (आयएसआयएस) आणि ‘अल-कायदा’च्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.