मेहबूबा मुफ्ती यांचे संताप आणणारे विधान – आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, संपून जाल
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तसेच पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मुफ्तींनी शनिवारी तालिबानचा उल्लेख करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तालिबानने अमेरिकेला पलायन करण्यास भाग पाडले. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, स्वातंत्र्यावेळी भाजप असता तर काश्मीर आज भारतात नसता असे अत्यंत वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.
मुफ्तींनी शनिवारी एका कार्यक्रमात तालिबानशी तुलना करत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. ज्यावेळी संयमाचा अंत होईल तेव्हा तुम्ही राहणार नाही, संपून जाल. अफगाणिस्तानात काय घडतंय ते पहा. अमेरिकेला तेथूनच बिऱहाड गुंडाळून परत जावे लागले. तुमच्यासाठी (सरकार) देखील आता संधी आहे. वाजपेयींनी ज्याप्रकारे काश्मीरमध्ये आणि बाहेर (पाकिस्तान) देखील चर्चा केली होती, त्याचप्रकारे तुम्ही देखील चर्चेचे सत्र सुरू करा असे धमकीवजा विधान मुफ्ती यांनी केले आहे.
..तर काश्मीर भारतात नसता
1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू-काश्मीरच्या नेतृत्वाला लोकांच्या विशिष्ट ओळखीचे सर्वप्रकारे रक्षण करण्याचा आणि विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. स्वातंत्र्यावेळी भाजपचे सरकार असते तर जम्मू-काश्मीर भारताचा हिस्सा झाला नसता असे धक्कादायक उद्गार मुफ्तींनी काढले आहेत.
..तर फाळणी होणार
भाजपने समंजसपणा न दाखविल्यास भारत सांप्रदायिक आणि धार्मिक आधारावर विभागण्यासाठी तयार आहे. भाजप काश्मीरमध्ये उपस्थित होणारा आवाज दडपण्यासाठी स्वतःच्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे मुफ्ती यांनी म्हटले आहे.