नवी दिल्ली/प्रतिनिधी
अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर रविवारी तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील हजारो स्थानिकांनी देश सोडून जाण्याच्या अपेक्षेने विमानतळाकडे धाव घेतली आहे. अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर जगभरात चर्चा सुरू आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे तालिबानच्या कृत्याचा अनेक देश निषेध करत आहे. भारतासाठी तालिबान ही अजूनही दहशतवादी संघटनाच आहे. परंतु लोकसभेतील समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने तालिबानच्या या कृत्याचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, तालिबानची तुलना थेट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी केली. त्यामुळे या प्रकरणी संबंधित खासदार आणि इतर दोन जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान मधील सद्य स्थिती पाहून जगभरात तालिबान्यांचा निषेध केला जातोय. मात्र, उत्तर प्रदेशच्या संभल मतगारसंघातील समाजवादी पक्षाचे लोकसभेतील ज्येष्ठ खासदार शफीकुर रेहमान बर्क यांनी तालिबान्यांच्या कृतीचं समर्थन करत त्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. “जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी लढला होता. त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आपण त्यात हस्तक्षेप कसा करू शकतो?” असं शफीकुर रेहमान म्हणाले आहेत.