लॉकडाऊन बाबत मात्र जिल्हाधिकाऱयांचे मौन : सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
कोविड-19 बाबत जिल्हाप्रशासनाने सर्व ती दक्षता घेतली आहे. बेळगाव बिम्स् हॉस्पिटलवर अधिक ताण येत असल्याने आता प्रत्येक तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये 30 कोविड बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेंव्हा जनतेने घाबरु नये. मात्र कोविडबाबत प्रत्येकाने स्वतःची दक्षता स्वतः घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी.हिरेमठ यांनी केले आहे.
शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. लॉकडाऊन बाबत मात्र अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. सध्या पाच तालुक्यामध्ये लॉकडाऊन आहे. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगून लॉकडाऊन करणार नसल्याचेच त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
कोरोना बाधित रुग्णांची सर्व ती दक्षता घेण्यात येत आहे. बिम्स्मधील डॉक्टरांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. जनतेनेही त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच तातडीने आम्ही प्रत्येक तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये कोविड वॉर्ड स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकूण जिह्यामध्ये 768 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मुरारजी देसाई वसतीगृहामध्ये 9 बेड, ईएसआय हॉस्पिटलमध्ये 25 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. केएलईमध्ये 65 बेडची सोय करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोरोनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 33 हजार 817 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. अजून 2 हजार 856 जणांचा अहवाल यायचा असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोविडची गंभीर लक्षणे असलेल्यांनाच कोविडवॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे. मात्र ज्यांच्या प्राथमिक चाचणीमध्ये कोणतीच लक्षणे नाहीत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. क्वारंटाईनमधून कोणीही बाहेर पडले तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत 61 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या पत्रकार परिषदेवेळी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र, जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ, मनपा आयुक्त जगदीश के. एच., तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, डॉ. तुक्कार आदी उपस्थित होते.