आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रतिपादन : चापगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त ओटी भरणी-सत्कार कार्यक्रमात सहभाग
वार्ताहर /चापगाव
खानापूर तालुक्यात विकासाचे स्वप्न घेऊन आपण आठ वर्षांपूर्वी सक्रिय समाजकारणात सहभाग घेतला. खानापूर तालुक्यातील जनतेने आपल्या कार्याची पोचपावती देत तीन वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडून दिले. जनतेने निवडून दिलेल्या विश्वासाला पात्र राहून आगामी काळात तालुक्यातील शेतकऱयांच्या सबलीकरणाबरोबरच सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. तालुक्यात शेतकऱयांच्या उत्पादित मालाला दर मिळावा, यासाठी हलगा येथे अंजलीताई केन्स शुगर्सच्या माध्यमातून लवकरच आपण कारखाना प्रकल्प सुरू करण्याचा मानस हाती घेतला आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी आणून विकसित करण्याचा दृष्टिकोन आपण ठेवला आहे. असे सांगून चापगाव भागात हाती घेतलेल्या विकासाभिमुख कामांचा आढावा घेत यापुढील काळातही विकासकामे क्रमबद्धरित्या हाती घेऊ, असे आश्वासन आमदार अंजली निंबाळकर यांनी चापगाव येथे शुक्रवारी श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ओटी भरणे व सत्कार कार्यक्रमात दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मादार होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत पिराजी कुऱहाडे यांनी करून नवरात्रोत्सवानिमित्त दरवषी आयोजित केल्या जाणाऱया दुर्गादेवी मंदिरातील कार्यक्रमांविषयी आढावा मांडला. त्यानंतर आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते देवीची ओटी भरणी व पूजा झाली.
दीपप्रज्वलन भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, ग्राम पंचायत अध्यक्षा स्नेहल सयाजी पाटील, उपाध्यक्ष मारुती चोपडे, सदस्य नागराज येळळूरकर यांसह मान्यवरांच्या हस्ते झाले. यानंतर विविध देवतांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्राम पंचायत अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष मारुती चोपडे तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य, कन्या विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पाटील, कृषी खात्यातील निवृत्त अधिकारी वाय. के. सागर यांचा सत्कार करण्यात आला.
विकास करण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे
यावेळी बोलताना महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर म्हणाले, तालुक्याचा व आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची असते. केवळ राजकारण म्हणून प्रतिरोध करण्यापेक्षा विकासासाठी जवळीक साधून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहेत. लैला शुगर्सच्या माध्यमातून शेतकऱयांचे सबलीकरण करण्यासाठी आता कारखान्याची जबाबदारी महालक्ष्मी ग्रुपने हाती घेतली असून कारखान्याचे विस्तारीकरण व शेतकऱयांना योग्य दर देण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले, माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, निवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पाटील आदींची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर भाजप नेते पंडित ओगले, नंदगड एपीएमसी सदस्य हणमंत पाटील, नंदगड ग्रा. पं. सदस्या वैष्णवी पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, ग्राम पंचायत सदस्य नागराज येळ्ळूरकर, नजीर सनदी, सूर्याजी पाटील, हणमंत मादार, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक देवस्थान कमिटीचे प्रमुख शिवाजी मादार यांनी तर आभार महादेव मादार यांनी मानले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.