पिके पुन्हा पाण्याखाली : नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ
वार्ताहर / किणये
तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी बहुतांश भागात पाऊस झाला असल्याने नदी-नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. बहुतांशी शिवारांमध्ये पाणी साचले असून पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत.
मागील आठवडय़ात जोरदार पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे बहुतांशी गावांचा संपर्कही तुटला होता. नद्यानाही पूर आल्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता होती. पण अशातच बुधवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.
बुधवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस येण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतशिवारात पाणी साचले असून तालुक्याच्या मार्कंडेय व मुंगेत्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणथळ शिवारात पाणी साचले असल्यामुळे बहुतांशी भागातील भात पिके कुजून जाण्याच्या मार्गावर आहेत. सोनोली, बेळगुंदी, पिरनवाडी भागातील काही रस्त्यांवर पाणी आले होते. यामुळे वाहनधारकांना बरीच कसरत करावी लागली.