वार्ताहर / किणये
तालुक्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील नागरिक सरकारच्या नियमांचे पालन करीत घरीच बसून आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी गावपातळीवरही प्रयत्न सुरू आहेत.
सॅनिटायझर व मास्कचा वापर करा, असे प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे. पण ग्रामीण भागातील नागरिकांना सॅनिटायझर व मास्क कोण उपलब्ध करून देणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काही ठिकाणी 10 रुपयांच्या मास्कची 30 ते 40 रुपये अशी विक्री करण्यात येत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ‘नो स्टॉक’चे फलक लागले आहेत. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत खेडय़ापाडय़ातील लोकांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
ग्राम पंचायती व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
भाजीपाला दारापर्यंत
रविवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. बऱयाच गावांमध्ये एपीएमसी वाहने दारापर्यंत येऊन भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. कर्नाटकातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बेळगावकरही चिंताग्रस्त बनले आहेत. शहरासह ग्रामीण जनता सतर्क झाली असून किराणा, औषधे, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाव्यतिरिक्त अन्य दुकाने बंद आहेत. गवंडी, सेंट्रींग कामगार वर्गही घरातच बसून आहे. किरकोळ प्रमाणात शेतकरी शिवारात जाऊ लागले आहेत.
बटाटा विक्रीची चिंता
सध्या पश्चिम भागात बटाटा पीक काढून ठेवलेले आहे. त्याची विक्री कशी करायची याची चिंता बळीराजाला लागून राहिली आहे. भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्याच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे कमी झाली आहे. मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसू लागला आहे.
शिवप्रतिष्ठान धामणेतर्फे साहित्याचे वाटप
29डीआय 38- शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धामणे विभागातर्फे गोरगरीब नागरिकांना धान्य व साहित्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱयांचे हाल होत असून त्यांना गृहोपयोगी साहित्यही उपलब्ध होत नाही. अशा लोकांना शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन साहित्याचे वाटप केले.
धामणे, ब्रह्मलिंगहट्टी, देवगणहट्टी, मासगौंडहट्टी, अवचारहट्टी आदी गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी फळे व इतर साहित्याचे वाटप केले. कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजींच्या शिकवणीनुसार सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आहे..