मणेराजूरी / वार्ताहर
तासगांव – कवठेमहांकाळ राज्य महामार्गावर मणेराजूरी पवार वस्तीजवळील वळणावर आयशर ट्रक उलटला यामध्ये आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवत हानी झाली नाही. रविवारी सकाळी सात वाजता घटना घडली. या राज्यमार्गावर रखडलेल्या दीड किलोमीटर रस्ता आणखी किती नुकसान करणार ? या रखडलेला रस्त्यावर तीन धोकादायक वळणे आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षात पंचवीस ते तीस जणांचा बळी गेला आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अशी की विजापूरहून तुरीचे भुसकाटाची पोती घेवून टाटा आयशर के ए डी -4556 हा तासगावकडे येत होता; तो कवठेएकंद येथे हा पोती उतरणार होता; परंतु पवार वस्तीजवळील वळणार चालकाचा ताबा सुटून हा आयशर पलटी झाला; यामध्ये चालक अब्दुल मुल्ला हा सुदैवाने बचावला ‘ पलटी होताना या आयशरचे टायर फुटले ‘यामध्ये आयशरचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले; या अगोदर याच वळणावर फरशीचा ट्रक उलटून दहा जणांचे बळी गेले होते. तर मोटारसायकल व इतर अपघात होवून बरेच बळी गेले आहेत.
तासगाव – कवठेमहांकाळ राज्य महामार्ग होवून तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु मणेराजूरीजवळील खंडोबा ओढा ते पवार वस्ती पर्यंतचा दीड किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाची भरपाई न मिळाल्यामुळे हा रस्ता रखडला असल्याचे समजते. त्यामुळे या दीड किमी रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. आणखी किती बळी व नुकसान झाल्यावर प्रशासन जागे होणार ? असा प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थ करीत आहेत.