ता. पं. ठरावाबाबत पाठविली नोटीस : उत्तर न दिल्याने सदस्यांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व उपनगरातील जमिनी बळकावल्यानंतर बुडाचा डोळा आता ग्रामीण भागातील तिबारपिकी जमिनीवर आहे. मनमानी कारभार करत आणि कोणालाही विश्वासात न घेता बुडा जमिनी ताब्यात घेत आहे. यापुढे तालुक्मयातील कोणत्याही गावातील जमिनी घ्यायच्या असतील तर तालुका पंचायत, ग्राम पंचायतमधील ना हरकतपत्र बंधनकारक असल्याचा ठराव तालुका पंचायतीमध्ये करण्यात आला होता. याबाबतची नोटीस तालुका पंचायतीने बुडाला दि. 18 नोव्हेंबर 2020 रोजी बजावली होती. मात्र या नोटिशीला वाटाण्याच्या अक्षता बुडाने लावल्या आहेत. त्यामुळे तालुका पंचायतमधील ठरावाला काही किंमत आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत असून सदस्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित ग्रामपंचायत आणि तालुका पंचायतची परवानगी घेऊनच जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी. सध्या ज्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात नोटीस पाठवून जाब विचारावा, असा ठराव तालुका पंचायतच्या सर्वसाधारण बैठकीत दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आला होता. हा ठराव महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उदय सिद्दण्णावर, सुनील अष्टेकर, नारायण नलवडे, काशिनाथ धर्मोजी, आप्पासाहेब कीर्तने आदींनी मांडला होता. याला सर्व सदस्यांनी अनुमती दिली होती. मात्र आता नोटीस पाठवूनही बुडाकडून कोणतेच उत्तर देण्यात आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तालुका पंचायतीने पाठविलेल्या नोटीसमध्ये येळ्ळूर, कडोली, काकती, आंबेवाडी, गुंजेनहट्टी यासह बेळगाव तालुक्मयातील 28 गावे बुडामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र या गावांचा समावेश बुडामध्ये झाला तर येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी बुडा प्रयत्न करणार आहेत. सध्या ग्रामीण भागात अनेक शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्या जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ग्रामीण भागातील कोणत्याही जमिनी बळकावण्याआधी ग्राम पंचायत किंवा तालुका पंचायतचे ना हरकतपत्र घेणे बंधनकारक करा, असे ठरावाद्वारे बुडाला कळविण्यात आले होते. मात्र बुडाकडून कोणत्याच प्रकारे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी तालुका पंचायतीच्या महात्मा गांधी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत तालुका पंचायतचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनुमते हा ठराव संमत करण्यात आला होता. या ठरावानुसार तालुका पंचायतकडून दि. 18 नोव्हेंबर 2020 रोजी बुडाला नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र त्याचे उत्तर अजूनही बुडाकडून आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बुडाकडून कोणत्याच प्रकारे उत्तर नाही : ता. पं. कार्यकारी अधिकारी-मल्लिकार्जुन कलादगी
सभागृहात ज्या प्रकारे ठराव झाला आहे त्याचप्रकारे आपण बुडाला माहिती दिली आहे. मात्र बुडाकडून अजूनही कोणत्याही प्रकारे आपल्याला उत्तर आलेले नाही. एकूण 28 गावांतील ही समस्या असली तरी बुडाकडून कोणत्याच प्रकारे उत्तर मिळत नसल्याने आपणही काहीच करू शकत नाही.
मोठे आंदोलन उभे करू : ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर
बुडाने शहरालगत असलेल्या 28 गावांतील जमीन बळकावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आम्ही हे कदापिही होवू देणार नाही. तालुका पंचायत सभागृहातून आम्ही ठराव मांडून याला विरोध केला आहे. त्याचप्रकारे नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे बुडाने जमीन ताब्यात घेण्यासाठी आल्यास मोठे आंदोलन उभे करू, असे त्यांनी सांगितले.