ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात अस्तित्वात असणारी तीन टप्प्यातील पंचायतराज व्यवस्था दोन टप्प्यात जारी ठेवण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी विधिमंडळ अधिवेशनावेळी तालुका पंचायत स्तर रद्द करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी दिली.
बेंगळूर येथे ग्राम पंचायतींच्या नूतन सदस्यांच्या सामर्थ्याभिवृद्धी कार्यक्रमाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तालुका पंचायतीचा उपयोग होत नसल्याची अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. पंचायतराज व्यवस्थेत ग्राम पंचायत आणि जिल्हा पंचायत हे दोन स्तर पुरेसे आहेत. पण, तालुका पंचायत व्यवस्था अचानक रद्द करणे शक्य नाही. त्याकरिता संविधानात दुरुस्ती करावी लागेल. ता. पं. रद्द करण्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून देण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकारला सर्व राज्यांची मते जाणून घेऊन निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.