वृत्तसंस्था /हैदराबाद
ऑस्ट्रेलिया-यजमान भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी तिकीट विक्रीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 4 जण जखमी झाले आहेत.
या सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी जिमखाना मैदानावर गुरुवारी सकाळपासूनच क्रिकेट शौकिनांनी गर्दी केली होती.
या सामन्याची तिकीट विक्री काही वेळातच बंद करण्यात आली. त्यामुळे निराश झालेल्या शौकिनांनी गोंधळ निर्माण केला. शौकिनांमध्ये तिकीट खरेदीसाठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 4 शौकीन जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.
मोहालीच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर शुक्रवारी खेळविला जाणार आहे.
मध्यंतरी कोरोना महामारीमुळे देशातील शौकिनांना क्रिकेट सामने पाहता आले नव्हते. त्यामुळे या मालिकेतील हैदराबादमध्ये होणाऱया तिसऱया सामन्यासाठी क्रिकेट रसिकात उत्सुकता आहे.