जमीन वादातून शेतातच काढला काटा
तिगडी (ता. बैलहोंगल) ग्राम पंचायत अध्यक्षाचा भीषण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून यासंबंधी बैलहोंगल पोलीस स्थानकात त्याच गावातील चौघा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
मुन्ना उर्फ मुक्तुमहुसेनी इकबाल बहाद्दुरसी (वय 35, रा. तिगडी) असे त्याचे नाव असून तो तिगडी ग्राम पंचायतीचा अध्यक्ष होता. त्याच गावातील अर्जुनाप्पा बसवाणेप्पा निलगुंद, अद्रुषाप्पा अर्जुनाप्पा निलगुंद, महांतेश अर्जुनाप्पा निलगुंद, निंगव्वा अर्जुनाप्पा निलगुंद (सर्व रा. तिगडी) या चौघा जणांविरुध्द भा.दं.वि. 302 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शेत जमीनीत उगवलेले गवत कापण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर विळय़ाने हल्ला करुन त्याचा भीषण खून करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे एएसपी प्रदीप, मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ कुसगल आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.
यासंबंधी रात्री जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी माहिती दिली असून खुनानंतर फरारी झालेल्या संशयित आरोपींना अटक करण्यासाठी बैलहोंगलच्या मंडल पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संशयित आरोपी एकाच कुटुंबातील आहेत.