प्रतिनिधी / पुणे
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने भाजपचा पराभव झाला. राज्याच्या पुढील विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले, तर भाजप 50 पेक्षा जास्त जागा जिंकून येऊ शकत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, हैदराबाद आणि राजस्थान येथील निवडणुकीत भाजपला यश आले असले, तरी तिथले स्थानिक प्रश्न वेगळे होते. पुणे आणि महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. एकजुटीच्या जोरावर भाजपला पराभूत करता येऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. भाजपचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. पुढच्या काळात या पक्षाची स्थिती अधिक खालावणार आहे.
शरद पवार यांच्यावर बायोपिकची निर्मिती करण्याचा अजून विचार केला नाही. लघुपट स्पर्धेच्या माध्यमातून बायोपिकबाबत शरद पवार यांच्यावर बायोपिक बनवण्याचा मार्ग दिसून आला, असे सांगून ते म्हणाले, शरद पवार यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि पक्षांतर्गत उपक्रमातून साजरा केला जाणार आहे.
यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आमंत्रण दिलेले नाही. कोरोना असल्याने आम्ही काळजी घेत आहोत. मुंबईमध्ये यशंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मोजक्या लोकांमध्ये कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम 36 जिह्यात आणि 350 तालुक्यात दाखवला जाणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सदस्य नोंदणीदेखील होणार असून, याची पावती डिजिटल माध्यमातून फाडली जाणार आहे. तसेच 13 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही पाटील यांनी या वेळी नमूद केले.