प्रतिनिधी/ वास्को
रेलमार्ग दुपदरीकरण, मोलेतील महामार्गाचा विस्तार तसेच या मार्गावरून वीज वहनाचा प्रकल्प केवळ कोळसा वाहतुकीच्या सोयीसाठीच केंद्र सरकार गोव्याच्या माथी मारत असून गोव्याला या प्रकल्पांची काहीच गरज नाही. हे प्रकल्प गोव्याचा नाश करतील. त्यामुळे सरकारने या प्रकल्पांचा नाद सोडावा. स्थानिकांच्या जमीनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी चिखली युथ फार्मर्स क्लब या संघटनेने केली आहे.
वास्को चिखलीतील पंचायत घरात या संघटनेच्या पदाधिकाऱयांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या गोव्यातील तीन्ही प्रकल्पांना विरोध करण्यात आला. यावेळी गोव्यातील विविध भागातील युवा युवती उपस्थित होत्या. संघटनेचे पदाधिकारी वेलरी आफोंन्सो, नेयोला परेरा, माविन परेरा, कॉन्चीता मोंतेरो, नॅक्सन फर्नांडिस यांनी या प्रकल्पांविषी आपली मते मांडली व सरकारकडून बळाचा वापर करून रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम पुढे रेटण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत, याविषयी माहिती दिली.
गोव्यात होऊ घातलेले केंद्रीय प्रकल्प गोव्याचा नाश करणारे आहेत. गोव्याचा युवा वर्ग शिकून पुढे येईपर्यंत गोव्याचा नाश झालेला असेल. त्यामुळे युवक गोव्याच्या हितासाठी पुढे सरसावलेला आहे. गोव्यात होऊ घातलेले तीन प्रकल्प आणि सागरमाला हा देशव्यापी प्रकल्प हे सगळेच एकमेकांशी निगडीत असून अस्टोलियात असलेला अदानीचा कोळसा गोव्यात आणून त्याची इतर राज्यात वाहतुक करण्याचा सर्व प्रकल्पांचा मुळ उद्देश आहे. गोव्याला वीजेची गरज नाही. गोव्याकडे अतिरीक्त वीज आहे. परंतु मोलेत वीज उपकेंद्र उभारून रेल्वे वाहतुकीला वीज पुरवठा करण्यासाठीच हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे.
या प्रश्नावर आम्ही स्थानिक आमदार व मंत्री माविन गुदिन्हो यांची भेट घेतली असता त्यांनी कोळसा वाहतुकीला विरोध करून रेलमार्ग दुपदरीकरणाला पाठींबा दिल्याचे व आम्हालाच सबुरीने वागण्याचा सल्ला दिल्याचे सांगून त्य़ांनी नाराजी व्यक्त केली. मंत्री आमदार असे राजकारणी या प्रश्नावर लोकांना फसवत आलेले आहेत. या प्रश्नावर गोवा सरकारने विधानसभा अधिवेशन घ्यावे आणि आपापली मते मांडावीत असे आवाहन युवकांनी केले. गोवा राज्याच्या हितासाठी आम्ही तुरूंगातही जायला तयार असल्याची भावना युवकांनी व्यक्त केली.