बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप आणि या राष्ट्रीय पक्षांना आव्हान देतोय मध्यवर्ती म. ए. समितीचा सिंह असेच वातावरण आहे. पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार हे आता निश्चित आहे. या लढतीतील प्रमुख उमेदवारांना नेमके काय सांगायचे आहे? ऐका त्यांच्याच शब्दात…
मराठी एकजुटीचा उद्देश यशस्वी
शुभम शेळके : सीमाप्रश्नासाठी-अन्यायाच्या विरोधात एकवटले मराठीजण : विजयापर्यंत मजल जाण्याची आशा
प्रतिनिधी / बेळगाव
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढय़ात कशी फूट पाडायची ते राष्ट्रीय पक्षांना चांगले माहिती आहे. लढा विखुरला की नुकसान आपलेच होते, आणि त्या पक्षात आपलेच बांधव झेंडा लावण्यापुरते मर्यादित राहतात. हे खटकल्यामुळेच मी व माझ्या युवा समितीने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. आता समाधान आहे की मराठी एकजुटीचा उद्देश यशस्वी झाला. सीमाप्रश्नासाठी, अन्यायाविरोधात मराठीजण एकवटला असून याचे फलित निवडणुकीतून दिसून येईल, असे मत मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सीमाभागात मराठी भाषिकांना नेहमीच डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. ‘फोडा आणि राज्य करा’ याप्रमाणे राष्ट्रीय पक्षांनी समितीमध्ये दुही निर्माण केली. म. ए. समिती ही पैसे कमविण्यासाठी अथवा राजकारण करण्यासाठी नसून ती भाषा व संस्कृतीच्या अस्तित्वाची लढाई आहे. दुफळी पडलेल्या समितीला पुन्हा एकत्र आणून लढय़ाला युवकांच्या माध्यमातून बळकटी देण्यासाठी म. ए. युवा समितीची स्थापना करण्यात आली. मागील काही वर्षात युवा समितीने मराठी शाळा वाचवा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, सीमाप्रश्नासाठी आंदोलने केली असल्याचे त्यांनी सांगितले.
घरची पार्श्वभूमी सर्वसामान्य
मूळचा तानाजी गल्ली येथील असल्याने सीमाप्रश्नाच्या चळवळी अगदी जवळून पाहता आल्या. सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने भाषेविषयीचे प्रेम, आत्मियता ही लहानपणापासूनच होती. चौथीमध्ये असताना म. ए. समितीचा पहिला महामेळावा होता. त्यावेळी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मेळाव्याला गेलो होतो. मराठीची झालेली अवस्था पाहून मन हेलावत होते. त्यामधून समितीच्या कार्यात सक्रीय होत गेल्याची आठवण त्यांनी नमूद केली.
मराठा आरक्षणासाठी करणार प्रयत्न
महाराष्ट्रासह देशात मराठा आरक्षणासाठी अनेक मूक मोर्चे निघाले. परंतु त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी लोकसभेत आवाज उठविणार आहे. बेळगावसोबतच गोकाक व रामदुर्गसह इतर कानडी प्रांतातील मराठा समाजाच्या व्यक्ती फोन करून पाठिंबा देत आहेत. ज्यांना मराठी येते किंवा मराठा मग ते कोणत्याही जाती-धर्माचे किंवा भाषेचे असोत, त्यामुळे अशा प्रत्येक मराठी माणसासाठी काम करणार आहे. मराठा असो वा मराठी त्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पक्षांवर कार्यकर्ते शोधण्याची वेळ
महानगरपालिकेसमोर लावण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज, मणगुत्ती व पिरनवाडी येथील प्रकरणानंतर सीमाभागातील तरुण भगव्या ध्वजाखाली पुन्हा एकदा एकत्र आला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांकडे गेलेले मराठी भाषिक युवक पुन्हा समितीमध्ये परतू लागले आहेत. तहान-भूक विसरून, खिशातील पैसे खर्च करून समितीचा प्रचार करीत आहेत. या उलट राष्ट्रीय पक्षांना पैसे देऊन, दमदाटी करून भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागत आहेत. समितीने स्वाभिमानी कार्यकर्ते घडविले असल्याने आज राष्ट्रीय पक्षांना कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली आहे.
इतर समाजांना घेणार सोबत
आजवर समितीने प्रत्येक समाजाला घेऊन काम केले आहे. त्यामुळे इतर समाजांचे अनेक लोकप्रतिनिधी समितीकडून निवडून आले आहेत. अशा सर्व समाजांना एकत्रित घेऊनच निवडणुकीला सामोरे चाललो आहे. यामुळेच प्रत्येक समाजाच्या व्यक्ती भेटून आपला पाठिंबा देत आहेत.
रस्त्यावर काम करणाऱया कार्यकर्त्यांची फौज
मध्यवर्ती म. ए. समितीने युवा उमेदवाराला उमेदवारी दिल्याने सीमाभागात उत्साह पसरला आहे. आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते असल्याने प्रत्येकाची नाळ ही सीमाप्रश्नाशी व मराठी मातीशी जोडलेली आहे. आज युवकांना मराठीवर होणारे अन्याय सहन होत नसल्यानेच ते प्रचारासाठी रस्त्यावर उतरत आहेत. इतरांसाठी ही जरी निवडणूक असली तरी आमच्यासाठी ही एक चळवळ आहे. या चळवळीत युवक मोठय़ा प्रमाणात सहभागी होत असून यामुळे सीमाभागात क्रांती घडेल, असा विश्वास शुभम शेळके यांनी व्यक्त केला.
आजही दडपशाही सुरू
म. ए. समितीला मिळणारा प्रतिसाद पाहून राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच प्रशासनाला हाताशी धरून दडपशाही केली जात आहे. दबाव, रोखण्याचे प्रकार हे आमच्यासाठी नवीन नाहीत. कोणत्याही दडपशाहीला, आमिषांना बळी न पडता मराठी अस्मिता दाखवून देण्यास मराठी भाषिक सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
साहेबांची अधुरी स्वप्ने पूर्ण करणार
मंगला अंगडी : संपूर्ण मतदारसंघातून भरघोस पाठिंबा; नवनवीन प्रकल्पांद्वारे करणार विकास
प्रतिनिधी / बेळगाव
सहनशीलता, स्वच्छ चारित्र्य आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार हे आपले दिवंगत पती सुरेश अंगडी यांचे वैशिष्टय़ होते. त्यांनी सर्व भाषिक आणि धर्मीय माणसे जोडून ठेवली आहेत. त्यांच्याबद्दल समाजात असलेला आदर आणि आपुलकी या पोटनिवडणुकीत कामी येत आहे. यामुळे निवडून येणार आणि साहेबांची सर्व अधुरी स्वप्ने पूर्ण करणार आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी बोलत होत्या. ‘तरुण भारत’ला निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी खास मुलाखत दिली. प्रचारादरम्यान जनतेचा मिळणारा प्रतिसाद भारावून जाण्यासारखाच आहे. याचबरोबर भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा उत्साहाने कामाला लागले आहेत. त्यांनी मला धीराने उभे केले आहे. यामुळे आपला विजय निश्चित आहे, असे त्या म्हणाल्या.
पती सुरेश अंगडी यांच्या निधनाने मी खचून गेले होते. मात्र, पक्षातील प्रमुखांनी त्यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी मला प्रवृत्त केले. डॉ. स्फूर्ती आणि श्रद्धा या मुलीही धीराने सोबत आल्या. दुर्दैवाने पती गेले तरी मतदारसंघासाठी त्यांनी बघितलेली स्वप्ने अधुरी सोडायची नाहीत. त्यांच्या विकासाच्या संकल्पनेला योग्य आकार द्यायचा आहे. यामुळेच आता वाटचाल सुरू केली असून जनतेने ही कल्पना सत्यात उतरविण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
चौथ्यांदा सलग खासदार होण्याची संधी मिळाली आणि रेल्वे राज्यमंत्रिपद लाभले. यामुळे साहेबांच्या कामाचा झपाटा वाढला होता. रेल्वे ओव्हरब्रिजची उभारणी, बेळगाव शहराचा स्मार्ट शहर म्हणून विकास, बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग, बेळगाव-बेंगळूर रेल्वेसेवा, उडान योजनेंतर्गत बेळगाव विमानतळाचा विकास, महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा, पासपोर्ट कार्यालय आदी प्रकल्प त्यांनी हाती घेऊन पूर्ण करून घेतले. बेळगावसाठी इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभारणीच्या स्वप्नासाठी ते झटत होते. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. सर्व कामांच्या पूर्ततेसाठी जनतेचा कौल मिळवून खासदार होण्याचे उद्दिष्ट आता डोळय़ासमोर असल्याचे त्या म्हणाल्या.
राजकारणाचे बाळकडू घरातूनच
आपल्यालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. गोकाकच्या कौजलगी घराण्यातली आपण कन्या आहे. घटप्रभा साखर कारखान्याचा पाया आपल्या वडिलांनी रचला. वडील या कारखान्याचे संस्थापक चेअरमन झाले. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू आपल्याला घरातूनच मिळाले आहे. पुढे सुरेश अंगडींची पत्नी महणून सर्वसामान्य माणसापासून उच्चपदस्थ नेत्यांसोबत आपला संपर्क आला. त्यांच्या प्रचारासाठी मी घरोघरी फिरलेली आहे. बेळगावच्या जनतेच्या व्यथा आपल्याला चांगल्याच माहीत आहेत. सर्व भाषिक आणि धर्माच्या नागरिकांना मी जवळून ओळखते. यामुळे फक्त खासदाराची पत्नी म्हणून मर्यादित न राहता त्यांच्या कामाला पाठबळ देण्याचे काम आपण सलग सतरा-अठरा वर्षे करीत आले आहे. याचा फायदा आता नक्कीच होत आहे.
रखडलेली कामे मार्गी लावणार
बेळगावच्या स्थानिक विकासाचा आराखडा आपण तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक कामे करायची आहेत. प्रत्येक विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करून घ्यायचा आहे. कोरोनाचे संक्रमण आणि साहेबांच्या जाण्यामुळे काही कामे रखडली असून ती मार्गी लावायची आहेत. याकामी पक्षाचे सर्वच सदस्य, अधिकारीवर्ग व संबंधित सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात स्मार्ट व्हिलेज, महिला व युवकांमधील बेरोजगारी हटविण्यासाठी प्रयत्न, औद्योगिक विकासाचे प्रकल्प आणणे, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देऊन नवउद्योजकांची निर्मिती आणि कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला धीर देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे, ही उद्दिष्टे डोळय़ासमोर ठेवली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
देश आणि पक्षासाठी काम करण्याची जबाबदारी
साहेबांच्या सतत दिल्लीवाऱया व्हायच्या. दरम्यान, त्यांना स्थानिक पातळीवर भेटण्यासाठी येणाऱयांना आपण स्वतः सामोरी जात होते. त्यांच्या समस्या व कामे समजावून घेऊन ती साहेबांपर्यंत पोहोचविण्यातला एक दुवा म्हणून आपण काम केले आहे. विशेषतः दिल्लीतल्या त्यांच्या कामाचाही अनुभव घेतला आहे. भाजप खासदार आणि मंत्रिमहोदयांच्या पत्नीवर्गासाठी ज्ये÷ नेते प्रकाश जावडेकर यांच्या पत्नी प्राची जावडेकर यांनी कमल सखी मंच या संघटनेची स्थापना केली. या संघटनेची आपण सक्रिय सदस्या आहे. मोठे पद मिळाले की कुटुंबासमवेत चैन आणि मौजमजा करण्याची संस्कृती भाजपात नाही. यामुळे देश आणि पक्षासाठी काम करण्याची जबाबदारी सुरुवातीपासूनच निभावत आले आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी संधी देऊन तर पाहा..!
सतीश जारकीहोळी : सेवाकार्यामुळे जनता देतेय प्रतिसाद; संपूर्ण जिल्हय़ावर होतेय पकड
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचाच बालेकिल्ला. मात्र, मागील चार टर्म भाजपच्याच गळय़ात पडल्या. याला अनेक कारणे आहेत. काँग्रेसचे अपयश आणि विविध लाटांचा प्रभाव दिसून आला. मात्र, विकासाच्या बाबतीत काहीच म्हणण्यासारखे न झाल्याने आता लाटा लोप पावल्या आहेत. जनता नवीन पर्याय स्वीकारण्यास तयार झाली आहे. सेवाकार्यामुळे संपूर्ण जिल्हय़ावर पकड निर्माण झाली आहे. यावेळी लोकसभेत जाण्याची एक संधी तर देऊन पाहा, या आवाहनास उदंड प्रतिसाद मिळत आहे.
काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी बोलत होते. निवडणुकीच्या तोंडावर ‘तरुण भारत’ला दिलेल्या खास मुलाखतीत आपण निवडून येणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार, मंत्री, पालकमंत्री या साध्या पदांवर असताना आपण केलेली कामे जनतेच्या डोळय़ासमोर आहेत. यामुळे यावेळी नक्कीच भाजपला हादरा देणार, असे त्यांनी सांगितले.
देशभरात वाढलेली महागाई, पेट्रोल, गॅस, खतांचे वाढते दर, बेरोजगारी या समस्याच भाजपबद्दलची नाराजी वाढवित आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघात विकास करण्यात भाजप अपयशी ठरले. बेळगाव शहर असो वा जिल्हा कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतानाच विकास झाला. विशेष म्हणजे बेळगावचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश होण्याचे सारे श्रेय काँग्रेसलाच जाते. 2013 ते 2018 या काळात सिद्धरामय्या सरकारने बेळगावचा प्रचंड विकास केला. तिसरे गेट ते पिरनवाडीचे रुंदीकरण असो, उद्यमबाग, बॉक्साईट रोड, कणबर्गी रोडचे रूप पालटविणे असो. सारी कामे आम्हीच केली आहेत. त्यामुळेच आज बँडेड शोरुम, कमर्शियल कॉम्प्लेक्ससारखे प्रकल्प येऊ शकले. उंची हॉटेल्स बेळगावला आली आणि साधे शहर ते मेट्रोपॉलिटन सिटी असे वर्गीकरण झाले. हे सारे होताना बेळगावच्या मतदारांनी पाहिले आहे. याचा फायदा आपल्याला नक्कीच होत आहे, असे त्यांनी सांगितले.
शहर विकासावर दिला भर
पूर्वी अभयारण्य पाहायचे झाले तर बेळगावच्या जनतेला म्हैसूर किंवा बेंगळूरला जावे लागत होते. आपण पालकमंत्री असताना स्वतः लक्ष घालून भुतरामहट्टी अभयारण्याचा विकास केला. गोवा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील पर्यटकांना बेळगावकडे आकर्षित करू शकलो. यापूर्वीचे पालकमंत्री बेळगावात दरमहा एक मासिक बैठक घेतली की आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी मोकळे व्हायचे. मी पूर्ण वेळ दिला. प्रत्येक आठवडय़ात जिल्हा पातळीवर दोन बैठका, जनता दरबार घेण्यासह मनपा प्रशासनावर लक्ष ठेवून शहर विकासावर भर दिला. चांगले क्रीडा संकुल, जलतरण तलाव, फुटपाथ, बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट शहरात वेगवेगळय़ा भागात उभारले. व्हॅक्सिन डेपोमधील ग्लास हाऊसची उभारणी केली. 200 बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले. मोठय़ा पदावरील नेते फक्त पोकळ आश्वासने देत फिरत होते. आपण काम करीत होतो. याचे फळ यावेळी नक्कीच मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपने व्यवसाय आणि व्यवहार संपवून टाकले
केंद्र व राज्यप्रणित भाजप सरकारची खोटी आश्वासने आणि अंमलबजावणीतील निष्क्रियता जनतेच्या नजरेत आली आहे. मेक इन इंडिया, काळे पैसे परत आणणे, बुलेट ट्रेन, गंगेची स्वच्छता सर्व काही फक्त कागदावरच आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे व्यापार, उद्योगक्षेत्र नाराज आहे. भाजपने व्यवसाय आणि व्यवहार संपवून टाकले आहेत. यामुळेच आता प्रचार करताना जनतेच्या प्रतिसादाचा वेगळा अनुभव येत आहे. पूर्वी लोकांना जमवावे लागत होते. आज लोक स्वतः जमून आमंत्रित करीत आहेत, स्वतः निवडून देण्याची ग्वाही देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव शहर सर्वजातीय नागरिकांचे शहर आहे. अशा ठिकाणी फक्त एक धर्म किंवा भाषेच्या राजकारणावर काम करून चालत नाही. सर्वांना समान न्याय देणे आवश्यक ठरते. याबाबतीत आपण केलेले कार्य जनतेने पाहिले आहे. अडचणींच्या काळात सहजपणे उपलब्ध होण्याची आपली पद्धत व दिवसरात्र केलेली सेवा याची पोचपावती मिळत आहे. भाजप आणि त्यांच्या प्रतिनिधींनी यापूर्वी केलेल्या चुका जनतेला आता पुन्हा पुन्हा नको आहेत, असे ते म्हणाले.
औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट
बेळगाव शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी आम्ही मोठे प्रयत्न केले. त्यानंतर दुर्दैवाने सरकार बदलले आणि त्याचा मोठा फटका बेळगावच्या जनतेला बसला. नियोजनशून्य कार्य आणि भ्रष्टाचारावर आळा घालून बेळगाव शहर खऱया अर्थाने स्मार्ट करण्याची गरज आहे. कणगला व कित्तूर प्रमाणेच बेळगावचा औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मिती ही उद्दिष्टे आहेत. जनतेच्या आशीर्वादाने खासदार बनून ही उद्दिष्टे साध्य करणार आहे, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली.