जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर फेकली गेल्यानंतर 48 तासांच्या आतच अतानू दासचे आव्हान देखील संपुष्टात आले आणि यामुळे तिरंदाजीत पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी भारताला आणखी प्रतीक्षा करावी लागेल, हे निश्चित झाले.
अतानू दासने यापूर्वी शेवटच्या 32 खेळाडूंमध्ये लंडन ऑलिम्पिक सुवर्णजेत्या जिन हेएकचा पराभव करत एकच खळबळ उडवून दिली होती. पण, येथे जपानच्या ताकाहारुविरुद्ध त्याला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. 2012 ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱया ताकाहारुने अतानू दासला 6-4 अशा फरकाने मात दिली. ‘ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक सामना, प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. आता प्रत्येक सामन्याची तुलना करणे योग्य ठरत नाही. पण, आजचा दिवस माझा नव्हता’, असे अतानू दास या लढतीनंतर म्हणाला.