प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊमुळे प्रवाशी संख्या घटल्याने तिरुपती-कोल्हापूर आणि कोल्हापूर-तिरुपती या विशेष एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिराने तसा निर्णय जाहीर करण्यात आला.
तिरुपतीहून कोल्हापूरकडे येणारी तिरुपती-कोल्हापूर (07415) ही एक्सप्रेस 26 मे ते 31 मे आणि कोल्हापूरहून तिरूपतीकडे जाणारी (07416) ही 28 मे पासून 2 जून पर्यंत रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असली तरीही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे सदर दोन्ही एक्सप्रेस रिकाम्या धावत होत्या. आता दोन जून नंतर प्रवाशी संख्या वाढल्यास रेल्वे पूर्ववत सुरू केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे केवळ प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वी लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-नागपूर मार्गावरील विशेष गाड्या अद्याप बंदच आहेत.