दहा गावांतील 2953 हेक्टर क्षेत्र केले राखीव : रानटी प्राणी, वनस्पतींना संरक्षण
प्रतिनिधी / दोडामार्ग:
वाघ, हरीण, बिबटे या सारख्या वन्यप्राण्यांसोबत रानटी हत्तींसाठी विशेष ओळख असलेल्या तिलारी खोऱयातील दहा गावांतील जंगलात आता अभयारण्य होण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहे. महाराष्ट्र शासनाने आता हे जंगल ‘तिलारी संवर्धन राखीव’ म्हणून घोषित केले आहे. 22 जून रोजी या संदर्भात महत्वाचा अध्यादेश मंत्रालय पातळीवर जाहीरही करण्यात आला आहे.
या राखीव जंगल खोऱयात अनेक गावांचा व त्यामधील शासकीय जंगलांचा सहभाग आहे. या संवर्धन राखीव क्षेत्रात दहा गावांतील मिळून 2953.377 हेक्टर क्षेत्र येणार आहे. कर्नाटकातून आलेल्या रानटी हत्तींमुळे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोरे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी कर्नाटकातून दाखल झालेल्या या हत्तींना हुसकावण्यासाठी ऑपरेशन ‘एलिफंट बॅक’ राबविण्यात आले होते. पण ते यशस्वी होऊ शकले नाही. प्रतिवर्षी हत्तींची संख्या वाढतच राहिली. या हत्तींचा आज तिलारी खोऱयातील अनेक गावांना त्रास सहन करावा लागत आहे. या हत्तींसोबत वाघ, बिबटे, रानडुक्कर आदी रानटी प्राण्यांचा उपद्रवही या भागातील जनतेला सहन करावा लागत आहे. तिलारी खोऱयातील गावागावात विस्तारलेले जंगल पाहता या ठिकाणी अभयारण्य उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु, म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर आता शासनाने हे जंगल तिलारी संवर्धन म्हणून जाहीर केले आहे.
प्राणी जातीय व वनस्पती विषय महत्व असलेल्या तसेच वाघ, बिबटे, हत्ती आदी संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ तिलारीचे हे जंगल संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आले आहे. वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये हे जंगल संवर्धन राखीव म्हणून ठरविण्यात आले आहे.
या गावांतील जमिनी राखीव
तिलारी खोऱयातील शासनाच्या मालकीच्या असलेल्या जमिनी या संवर्धन राखीव क्षेत्रासाठी घेतल्या जाणार आहेत. यासाठी 2953.377 हे. एवढी जमीन निश्चित केली गेली आहे. यामध्ये तिलारी परिसरातील बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे खुर्द, केंदे बुदुक, पाटये, शिरंगे, कोनाळ, आयनोडे, हेवाळे, मेढे या गावांतील शासकीय जमिनींचा समावेश आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल इंडिया गॅस पाईप लाईन अंतर्गत बांबर्डे, घाटिवडे, मेढे या तीन गावांतील संबंधित जमिनीही घेतल्या जाणार आहेत. गेल इंडिया कंपनीला या जमीन क्षेत्रामध्ये काही दुरुस्ती करायाची झाल्यास सदर प्रकल्प यंत्रणेला त्या अनुषंगाने तशी सवलत दिली जाणार आहे.