चंदगड तालुक्यातील पश्चिम भाग पर्यटनाचे केंद्र : शासनाचे विकासाकडे दुर्लक्ष : उंच ठिकाणी अद्याप सुरक्षा कठडे नसल्याने धोकादायक
विश्वास पाटील /हेरे
चंदगड तालुक्यातील पश्चिम भाग हा पर्यटनाचे मुख्य केंद्र मानला जातो. हिरवा निसर्ग, जंगल परिसर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वळणदार रस्ते, फेसाळणारे धबधबे, घाटमाथा, परिसरातील पाण्याची तळी, धरणे, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले किल्ले, स्वप्नवेल पॉईंट, रातोबा पॉईंट, बाबा धबधबे, माउली मंदिर अशी तिलारी, पारगड परिसरात पर्यटनाची मुख्य केंद्रे असल्याने वर्षभरात वर्षा पर्यटनासह हजारो पर्यटक निसर्गाची देणगी असलेल्या चंदगड तालुक्मयातील तिलारी, पारगड परिसरात दाखल होतात. येथील पर्यटनाचा मुख्य केंद्र भाग तिलारी असला तरी सोयी सुविधांअभावी वंचित आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शासनाने विकासाकडे दुर्लक्ष केले आहे.
एकेकाळी तिलारी परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलत असायचा. ज्यावेळी कॉलनीमध्ये कामगार राहत होते. पण कालांतरानंतर कॉलनी पडझडीला आली आणि रहिवासी लोकांची संख्या कमी झाली. त्यामुळे या परिसरात पर्यटनाला म्हणावी तशी चालना मिळाली नाही. या परिसरात निसर्गाची वेगळीच झाक पाहायला मिळते. त्यामधील तिलारी परिसरातील सूर्यास्त दर्शन पॉईंट हा घाटमाथ्यावरचा पॉईंट खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळी होणारा सूर्यास्त पाहताना रंगांची उधळण झालेले आभाळ डोळे दीपवून टाकते. अनेक पर्यटक हे गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, कोकण अशा ठिकाणावरून येतात. अपूर्ण रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, अनेक खोल दऱया ज्याठिकाणी सुरक्षा भिंती, सुरक्षा कठडे, सुरक्षारक्षकांचा अभाव, रस्त्यांवर सूचनाफलक नसल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकदा वाहन पंक्चर होणे व अपघाताला ही चालना मिळते. तिलारीपासून जवळ असलेला स्वप्नवेल पॉईंट सह्याद्रीच्या पर्वतरांगाने बहरला आहे. वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची पहिली पसंती ही स्वप्नवेल पॉईंट असते. फेसाळणारे धबधबे येथील मुख्य आकर्षण असून जंगल भरारीही केली जाते. त्यामुळे परिसरात असलेले गवीरेडे, हरीण, मोर, वनगायी, रानडुक्कर, अस्वल, हत्ती यासह अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन होते.
पर्यटकांची गैरसोय
पर्यटकांसाठी या परिसरात हॉटेल्स उपलब्ध आहेत. पण तरीही पर्यटनाला म्हणावी तशी उभारी न मिळाल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते आहे. ज्याठिकाणी डोंगर-दऱया, कडेकपारी, पाण्याची तळी, धरण भाग, घाटमाथा अशी धोकादायक ठिकाणे आहेत. याठिकाणी अनेकदा सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. 2015 साली सूर्यास्त पॉईंट येथून हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची डॉक्टरांची टीम दरीत कोसळली होती. व पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2018 साली बेळगाव येथील वर्षा पर्यटनासाठी आलेले पाच तरुण याच ठिकाणावरून खोल दरीत आपल्या वाहनासह कोसळले होते. त्यामध्येही पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. एकूण दहा पर्यटक परिसरात जीवाला मुकले आहेत. पण सुरक्षिततेचा भाग म्हणून आजही या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा फेसाळणाऱया धबधब्यात उडी मारून धरण भागात अंघोळ करताना व घाट माथ्याने प्रवास करताना अपघात घडले आहेत. व अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. तरीही तिलारी, पारगड परिसरात सुरक्षिततेचा अभाव दिसतो. ऐतिहासिक वारसा असलेला किल्ले पारगड ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो आहे. ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला म्हणून आजुबाजूच्या शहरातील पर्यटकांची मांदियाळी असते. बेळगाव, गोवा येथून हजारो तरुण-तरुणी या धबधब्याकडे वळतात. सुटीचा मनमुराद आनंद घेतात. पण रस्ते व इतर अनेक गोष्टी अपूर्ण असल्याने उत्साही पर्यटकांना निराशेच्या सावटाखाली वावरावे लागते. उंच ठिकाणी अद्याप सुरक्षा कठडे नसल्याने पर्यटकांच्या जीवावर अनेकदा पर्यटन बेतते. शिवाय मद्यधुंद पर्यटकांची विचारपूस केली जात नाही. त्यामुळे अपघातांना चालना मिळते. स्थानिक ग्रामपंचायतीने पाठपुरवठा करून व लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून काम केल्यास पर्यटनाला वेगळी चालना मिळेल.
ऐतिहासिक वास्तूंचे जतन…
शिवप्रतिष्ठानचे तरुण सेवक गडांवरील स्वच्छतेचे काम करतात. व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करतात. पण परिसरातील पर्यटन विचारात घेऊन पर्यटनाला उभारी दिल्यास पर्यटनाला गती मिळेल. व पर्यटकांची रीघ वाढेल.
-संतोष गावडे, सरपंच वाघोत्रे