दोडामार्ग – वार्ताहर-
दोडामार्ग शहरातील म्हावळंकरवाडी मार्गे गोव्याच्या दिशेने गेलेल्या तिलारी पाठबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या बरासचा भाग पुन्हा एकदा खचत चालला आहे. त्यामूळे या कालव्यानजीकच्या मार्गावरुन केळीचेटेंब येथे ये- जा करणारी शाळकरी मुले, नागरिक, शेतकरी, जनावरे यांना धोका निर्माण झाला असुन कालवा विभागाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी म्हावळंकरवाडी, केळीचेटेंब येथील रहिवाश्यांनी केली आहे. गेल्या वर्षी या संदर्भात लक्ष्मण कवठणकर यांनी हीच मागणी केली होती.
तिलारी पाठबंधारे आंतरराज्य प्रकल्पातंर्गत उजवा कालवा तसेच डावा कालवा असे दोन मोठे कालवे काढण्यात आले आहेत. यातील उजवा कालवा दोडामार्ग तालुक्यातील घोटगे, मणेरी, सासोली मार्गे गोव्यात पेडणे तालुक्याला मिळतो. तर डावा कालवा आंबेली तसेच दोडामार्ग शहरातील केळीचेटेंब, म्हावळंकरवाडी, धनगरवाडी, वरची धाटवाडी मार्गे गोव्यातीलच डीचोली तालुक्याला मिळतो. या दोन्ही मोठ्या कालव्यातून गोव्याला पाणी सोडण्यात येते. दोडामार्ग शहरातील केळीचेटेंब, म्हावळंकरवाडी येथून जो कालवा गोव्याच्या दिशेने प्रवाहित करण्यात आला आहे. त्या कालव्याचा काही भाग गेल्या दोन वर्षापासुन अनेक ठिकाणी कोसळतो आहे. केळीचेटेंब, म्हावळंकरवाडी येथून दररोज ये- जा करणारे शेतकरी नागरिक तसेच शाळकरी मुले यांना या कोसळलेल्या भागामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
कित्येकवेळा कालव्या लागतच्या मार्गावरुन प्रवास करताना धोका निर्माण होतो. या संदर्भात कालव्याची दुरुस्ती, डागडूजी करण्याकडे येथील नागरिकांनी अनेकवेळा तिलारी प्रकल्पाच्या कालवा विभागाकडे कळविले आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. तिलारी प्रकल्प प्रशासनाकडून याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले आहे असा आरोप सदरच्या केळीचेटेंब, म्हावळंकरवाडी मधील नागरिकांनी केला आहे. या कालव्यालगतचा हा भाग पावसाळ्यानंतर तरी दुरुस्ती करण्यात येईल काय ? असा सवाल संबधित कालवा विभागाला या स्थानिक नागरिक लक्ष्मण कवठणकर यांनी केली आहे.