रहिवाशांची धांदल : सरपंचांनी केली मध्यस्थी
वार्ताहर / दोडामार्ग:
जलसंपदा विभागाने वीज बिल भरणा न केल्यामुळे महावितरणने तिलारी प्रकल्प वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे वसाहतीमधील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. याबाबत सदर वसाहत असलेल्या कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी महावितरण व जलसंपदा विभाग या दोहोंना कल्पना देऊन तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा सुरू करून घेतला.
महावितरणकडून गणेशचतुर्थीनंतर थकित वीज बिलांची जोरदार वसुली सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी कोनाळ येथील तिलारी प्रकल्प वसाहतीत घडला. वसाहतीशी निगडित जलसंपदा विभागाने थकित बिले न भरल्यामुळे त्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, या अचानक कारवाईने वसाहतीत एकच गोंधळ उडाला. विशेषतः ऑनलाईन अभ्यास-परीक्षा, क्लासेस, व ऑनलाईन कामे करणाऱयांची धावपळ उडाली. ही गोष्ट कोनाळ सरपंच पराशर सावंत यांना समजताच त्यांनी तात्काळ महावितरणचे दोडामार्गमधील अधिकारी श्री. आप्तेकर यांच्याशी संपर्क साधत वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना केली. तसेच थकित बिलासंदर्भात जलसंपदा विभागाशी संपर्क साधला. त्यांना लवकरात लवकर बिले भरण्याचे आवाहन केले.
दरम्यान, शासनाचा जलसंपदा विभाग तिलारी खोऱयात मोठ-मोठे प्रकल्प, पार्क आणण्याच्या घोषणा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात जलसंपदा विभाग थकित बिले भरण्यास सक्षम नाही. तसेच शासनाने तिलारी परिसरातील खड्डेमय रस्तेदेखील अद्याप सुस्थित केले नाहीत. मग या प्रकल्पांचा उपयोग काय, असा सवाल सावंत यांनी केला आहे.