धरणग्रस्तांच्या घरांच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही
प्रतिनिधी/ चिपळूण
तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 10 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे, याचे समाधान आहे. उर्वरित धरणग्रस्तांनाही 1 वर्षाच्या आत घरे देण्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.
तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे येथे सिद्धीविनायक न्यासाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते शुक्रवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे येथील डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे. कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन केलेल्या मदतीचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देताना आजूबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडू नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. निसर्गाची ताकद मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. हे लक्षात घेऊन राज्यभरात अशा घटना घडू नयेत, यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. वित्तहानी भरून काढता येते, परंतु मनुष्यहानी न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे, हे प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले की, मंदिराने या आपत्तीच्या प्रसंगात तिवरे धरणग्रस्तांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पैसा भाविकांनी मंदिरात दान केलेला पैसा आहे व तो राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी वापरण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ऍड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह तिवरेचे ग्रामस्थ उपस्थित होते.