चिपळूण / प्रतिनिधी
तिवरे धरण दुर्घटनेला तब्बल 17 महिने उलटून गेले. धरण फुटीची चौकशी करणाऱया एसआयटीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर करूनही तो आजतागायत जाहीर केलेला नाही. असे असतानाच खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी येथे तिवरे धरणाची पुनर्बांधणी आणि एसआयटीच्या चौकशी अहवालावर बोलताना अहवाल बाहेर येईल, पण तो कधी येईल हे आज सांगता येणार नसल्याचे उत्तर दिले.
ते पुढे म्हणाले की, तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. भविष्यात असा कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून वॉल बांधणीचा विचार आहे. सध्या कोरानामुळे निधी उपलब्धतेवर बरेच काही अवलंबून आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील परशुराम ते खेरशेत या टप्प्यातील केवळ सात टक्के काम झालेले असून येत्या मे महिन्यापर्यत किमान 20 टक्के चौपदरीकरण पूर्णत्वास जाईल, अशी हमी ठेकेदार कंपनीने दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सव्वा वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आलेल्या सभापतीना मुदतवाढ देणार की फेरबदल करणार, या प्रश्नावर ते म्हणाले की, या बाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र कोरोनामुळे काम करण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱयांनी केली आहे. या संदर्भात 12 रोजी रत्नागिरीत शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची व त्यानंतर महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. यापुढील निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील या मताशी शिवसेना ठाम आहे. अणूऊर्जा प्रकल्प होणे आता कठीण असल्याने त्या संपादित जागेवर पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला 5 हजार मेगावॅटचा सोलर एनर्जी पार्क प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. कोरोनात चांगले काम करत असतानाही देवेंद्र फडणवीस पुरस्कृत भाजपातील विकृत विचारसरणीचे रॅकेट ठाकरे सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहे. टवाळखोरांची टोळी सोशल मिडियावर विकृत चाळे करत आहे. नारायण राणे हे एक प्यादे आहे. सत्तेसाठी हे सर्वजण पछाडलेले असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.