नळपाणी योजना लोकार्पण कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांची घोषणा,
चिपळूण
तालुक्यातील तिवरे दुर्घटनाग्रस्तासाठी खऱया अर्थाने सिध्दीविनायक पावला आहे. पुनर्वसन वसाहतीचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होणार असल्याची घोषणा खासदार विनायक राऊत यांनी केली. दुर्घटनेचा विचार करून यापुढे हे धरण मातीचे न बांधता ते आरसीसी बांधले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
तालुक्यातील तिवरे-गावठण येथे रविवारी झालेल्या नळपाणी योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 11 कोटी रुपये खर्च करुन दुर्घटनाग्रस्तांसाठी या ठिकाणी वसाहत उभी करणार आहे. त्यापैकी 5 कोटी रूपये सिद्धीविनायक ट्रस्टने दिले असल्यामुळे त्यास सिध्दीविनायक नगर असे नाव दिले जाणार आहे. तिवरे दुर्घटनेत नळपाणी योजना उद्ध्वस्त झाल्यानंतर ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 20 लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर वर्षभरातच तिवरे ग्रामस्थांना पाणी योजना देऊ शकलो, यांचे विशेष समाधान वाटते. तिवरे पुनर्वसनासाठी 56 घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून 5 कोटी रुपये सिध्दीविनायक ट्रस्टने दिले आहेत. आणखी 6 कोटी रुपये मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या रकमेतून भक्कम अशी वसाहत होणार असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सभापती धनेश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, संतोष थेराडे, दीप्ती महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्राप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.