दरवर्षी दुरुस्ती अन् महापुराचा फटका : हेम्माडगा मार्गांवरील हलात्री पूलही राहिला शासनाच्या कागदावरच
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी पावसाने कहर केला. परिणामी या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. हेम्माडगा मार्गवरील तिओली गावाला जोडणाऱया नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने यावर्षीही रस्त्याचा संपर्क तुटला आहे. पुलात गाळ साचल्याने पाण्याच्या अतिदाबाने एका बाजूने कटडा तुटल्याने पूल प्रवाहात वाहून गेला आहे. तिवोली मार्गावरील नाल्यावर असलेल्या या पुलाचे ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न या भागातील जनतेतून उपस्थित होत आले.
पाण्याच्या अतिप्रवाहाने हा पूल एकाबाजूने वाहून जात आहे. त्यामुळे तिवोलीचा हेम्माडगा भागातील संपर्क तुटत आहे. परिणामी येथील नागरिकांना गुंजी रेल्वेस्टेशन मार्गे जवळपास 35 किलो मिटर अंतर कापून खानापूरला यावे लागणार आहे. त्यातच गुंजीकडील खानापूरला येणारा महामार्गही बंद झाल्य़ामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. यावर्षीही या पुलाचा भराव वाहून गेल्याने जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तिवोली गावाला जोडणाऱया हलात्री पुलावरील या पुलाची समस्या कधी संपणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
हलात्री नाल्यावरील लहान पूल वारंवार पाण्याखाली जात असल्याने ग्रामपंचायतीने त्यावेळी रोहयो योजनेच्या सहकार्यातून तसेच आमदार फंडातून 19.50 लाख रुपये खर्चून याचा विकास साधला व पुलाची उंची वाढवून त्याचे नूतनीकरण केले होते. पण ते काम चांगले झाले नव्हते. वास्तविक पुलाला सिमेंट पाईप घालण्याऐवजी पिलर घालून पूलाची निर्मिती करणे गरजेचे होते. पण अभियंत्याची मनमानी नडली. त्यानंतर पुलाची पुनर्बांधणी केली. पण त्या पुलाच्या प्रवाहात जंगलातून वाहून येणारे बांबूचे बेट तसेच झाडांच्या फांद्या वाहून येत असल्याने पुलाखाली गाळ साचून धोका निर्माण होत आहे. दरवर्षी होणारी समस्या लक्षात घेता. या पुलाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव जिल्हा पंचायत विभागाने हाती घ्यावा, अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे.
1982 पूर्वी हलात्री नाल्यावर पूलच नव्हता. यामुळे पावसाळा आला की, हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने पूर्णपणे बंद होऊन मणतुर्गा, नेरसा, गवाळी, कोंगळा, पास्टोली, तिवोली, शिरोली, डोंगरगाव, तेरेगाळी, जामगांव, अबनाळी, हेम्माडगा, देगाव, मेंडील, पाली, तळेवाडी तसेच जोयडा तालुक्यातील काही गावांचा संपर्क पूर्णपणे बंद होत होता. यामुळे हलात्री नाल्यावर पूल बांधावा, अशी या भागातील जनतेची मागणी होती. पण या मागणीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले होते.
पुलाच्या पुनर्बांधणीची आवश्यकता
तिवोली गावाला जोडणारा हा हेम्माडगा मार्गावरील मुख्य रस्ता आहे. या मार्गावर येणारा हलात्री नाला दरवर्षी तुडुंब वाहतो. मोठमोठी झाडे, बांबूचे बेट वाहून येतात. या नाल्यावरील पुलाची बांधणी चुकीची झाली आहे. वास्तविक पाईपऐवजी पिलर घालून पूल उभा करणे गरजेचे असताना नाममात्र काम झाल्याने दरवर्षी ही समस्या उदभवत आहे. यासाठी आमदार डॉ. निंबाळकर यांनी लघु पाटबंधारे विभागाकडून तिवोली गावाला जोडणाऱया या रस्त्यावरील पुलाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आहे.
-सुभाष पाटील, एपीएमसी सदस्य-तिवोली