मुंबई\ ऑनलाईन टीम
दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकाराकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील अंगणवाडी सेविका, आणि आशासेविकांबरोबर ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या टास्कफोर्समधील डॉक्टर देखील या बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आरोग्य सेविकांवरचं ओझ कमी झालेलं नाही. आपलं काम हे सातत्याने चालू ठेवायचे आहे. कोरोना सदृश्य असलेले रुग्ण आणि आता पावसाळ्यामध्ये कोव्हिड आणि नॉन कोव्हिड हे ओळखणे थोडं अवघड होणार आहे. या पावसाळी साथीत आपल्याला काम करायचे आहे. कोकण पट्ट्यात येत्या दोन दिवसांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अशी आव्हाने आपल्या समोर येत राहणारचं आहेत. या आव्हानांना तुम्ही सगळ्या लढवय्या, वीरंगणा, मर्दासारख्या लढणाऱ्या आहात. त्यामुळे अशा आव्हानांना न डगमगता कोरोनाचे संकट थोपवायचे आहे. दुसरी लाट आल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना आहे. तिथं तुमचं काम अधिक आहे. आतापर्यंतही तुम्ही खूप काम केलं आहे. घरोघरी जाऊन पाहणी, तपासणी केली आहे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राला कुटुंब म्हणून जपलं आहे. तिच मदत तिसरी लाट थोपवताना हवी आहे, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
आशा आणि अंगणवाडी आपल्या प्रशासनाचा पाठकणा आहे. त्या कर्तव्य म्हणून काम करतायंत. सरकारच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्याकडे आधी लक्ष दिलं. तुमच्या आशा, अपेक्षांकडे लक्ष देणार तितक्यात कोरोना संकट आलं. पण तुम्हाला विसरलो आहोत असं समजू नका. आपले ऋण विसणार नाही. परतफेड करणं शक्य नसलं तरी तुमच्या वेदनांची दखल घेतली आहे. त्यावर मी नक्कीच मार्ग काढणार असून त्यासाठी थोडा अवधी लागेल. सरकारला थोडी मुभा द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
आजपर्यंत करत असलेल्या तुमच्या कर्तव्यबद्दल आणि पुढे अपेक्षित असलेल्या कर्तव्यबद्दल आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी मानाचा मुजरा केला.
.
.
.