खेलो इंडिया युथ गेम्स, गुवाहाटी; महाराष्ट्राच्या पथकाचे टाळय़ांच्या गजरात स्वागत
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
केवळ उपस्थित खेळाडू नाही, तर देशभरातील खेळाडू आणि युवकांमध्ये जोश निर्माण करणाऱया शानदार सोहळय़ात शुक्रवारी तिसऱया खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन झाले. आसामच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया या उद्घाटन सोहळय़ानंतर मैदान सोडताना प्रत्येकाच्या तोंडी ऑसम असेच शब्द येत होते.
गुवाहाटीच्या मध्य वस्तीत असणाऱया इंदिरा गांधी स्टेडियमवर हा सोहळा दोन तास रंगला होता. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक सोहळय़ाने सर्वांचे डोळे दिपून गेले. आसामची कहाणी सांगणाऱया या सोहळय़ात आसामच्या निर्मितीपासून, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम, युद्ध कलेचे दर्शन, पारंपरिक संगीत, नृत्य अशा सर्वांचे सुरेख दर्शन झाले. या आसामच्या दर्शनानंतर आसाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश या पूर्वेतील राज्यांचे नाव गाजविणाऱया खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योत मैदानात आणण्यात आली. त्यानंतर आपल्या लयबद्ध धावेने आसामला आंतरराष्ट्रीय ओळख देणाऱया हिमा दासने मुख्य ज्योत प्रज्वलित केली. या वेळी हिमाचे करण्यात आलेले स्वागत लक्षवेधी ठरले. यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी स्पर्धेचे उदघाटन झाल्याचे जाहिर केले.