वृत्तसंस्था / मुंबई
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतीय शेअर बाजारासह अन्य आर्थिक क्षेत्रात दबावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी मोठी घसरण राहिली होती, तर मंगळवारच्या सत्रात काहीशा प्रमाणात बाजार सावरल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु बुधवारच्या सत्रात मात्र सर्व घसरणीला ब्रेक लावत नुकसानीची भरपाई करत बाजारात सेन्सेक्सने 460 अंकांची उसळी नोंदवली आहे.
नव्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या वातावरणामुळे अर्थव्यवस्थेसमोर नवीन संकट निर्माण होत असल्याने चिंता निर्माण झाली असतानाच याच दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरणासंदर्भातील समितीने बुधवारी द्वीमासिक समीक्षेमध्ये कर्ज स्वस्त करण्याचा प्रस्ताव कायम ठेवण्यासोबतच पहिल्या तिमाहीत अन्य घोषणा केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 460.37 अंकांनी वधारुन निर्देशांक 49,661.76 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,819.05 वर स्थिरावल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे समभाग दोन टक्क्यांनी मजबूतीमध्ये राहिले असून यासोबत आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक,महिंद्रा ऍण्ड महिंद्रा , बजाज ऑटो आणि मारुतीचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. दुसऱया बाजूला टाइटन, एनटीपीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
बाजाराला दिलासा
बुधवारच्या सत्रात कोरोनाच्या काळजीने दबावात असणारा शेअर बाजार आरबीआयच्या निर्णयामुळे काहीसा सावरला असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाची धास्ती घेऊन व्यवहार करणाऱया गुंतवणूकदारांना एक विश्वास प्राप्त झाल्याने शेअर बाजार मजबूत स्थितीत राहिला असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात प्रामुख्याने शांघाय आणि हाँगहाँग नुकसानीत राहिला, तर सोल आणि टोकीयो हे शेअर बाजार तेजीसह बंद झाले आहेत. युरोपमधील बाजारात कल मात्र सकारात्मक राहिला होता. जागित बाजारात कच्चे तेल मानक ब्रेंट 0.37 टक्क्यांनी घसरुन 62.97 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.