अखेर चार वर्षांनंतर उड्डाणपूल वाहनधारकांसाठी होणार खुला : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेखात्यामार्फत उड्डाणपुलांची उभारणी
प्रतिनिधी /बेळगाव
तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिसऱया रेल्वेफाटकावर नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. बुधवार दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रेल्वे खात्यामार्फत उभारण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे उद्घाटन देखील केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरातील विविध ठिकाणी असलेल्या रेल्वेफाटकांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेखात्यामार्फत उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. यापूर्वी ठिकठिकाणी तीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच तिसऱया रेल्वेफाटकावर देखील उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी 2018 मध्ये भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले नाही. अशातच कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी काम करणारे कामगार गावी गेल्याने उड्डाणपुलाचे काम दोन वर्षे ठप्प झाले होते.
मात्र वर्षभरापासून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते. पण हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने पूर्णत्वास ऑक्टोबर उजाडला आहे. तिसऱया रेल्वेगेटवर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी खोदाई करण्यात आल्याने वाहनधारकांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार? अशी विचारणा वाहनधारक करीत होते. अखेर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून बुधवारी लोकार्पण सोहळा होणार आहे. जिल्हा पालकमंत्री, खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अखेर चार वर्षांनंतर उड्डाणपूल वाहनधारकांसाठी खुले होणार आहे.