रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी : वाहनधारकांसह स्थानिक व्यावसायिक-नागरिकांनाही करावा लागतोय धुळीचा सामना
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरांमधील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तिसरे रेल्वेगेट परिसरात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने माती टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. पण सध्या ये-जा करणाऱया वाहनांमुळे धूळ उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनाही धुळीचा सामना करावा लागत असून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
महापालिका हद्दीतील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पण शहरांतर्गत तसेच उपनगरांतील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. विशेषतः तिसरे रेल्वेगेट परिसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे या परिसरातील रस्ते पूर्णपणे खराब झाले असून खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पावसाळय़ात या ठिकाणी तळय़ाचे स्वरूप आले होते. या रस्त्यावरून अवजड वाहनांसह अन्य वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. परिणामी पावसात वाहने अडकण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे तिसरे रेल्वेगेट परिसरात निर्माण झालेल्या खड्डय़ांमध्ये दगड, माती घालण्यात आली होती.
आता टाकण्यात आलेल्या मातीमुळे धूळ उडत आहे. या रस्त्यावरून शेकडो वाहनांची ये-जा असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीचा सामना परिसरातील रहिवाशांना तसेच व्यावसायिकांना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर घालण्यात आलेली खडीही उखडली असून दुचाकी वाहने घसरून पडत आहेत.
डांबरीकरणाकडे दुर्लक्ष
दुचाकी वाहनधारक आणि पादचाऱयांच्या डोळय़ात धूळ जात असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तिसऱया रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पण याचा फटका वाहनधारकांना व व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.