जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
वांडरर्सवरील भारताविरुद्धचा विजय दक्षिण आफ्रिकन संघासाठी योग्य दिशेने वाटचाल सुरु असल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यासाठी सध्याच्या रणतीतील काहीही बदल नसेल, असे प्रतिपादन या संघाचा कर्णधार डीन एल्गार याने केले. रणनीतीत बदल होणार नाही. मात्र, सुधारणेला अद्याप बराच वाव आहे, याचा त्याने येथे उल्लेख केला. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक तिसरी कसोटी मंगळवारपासून (दि. 11) केपटाऊनमधील न्यू लँड्स मैदानावर खेळवली जाणार आहे.
आतापर्यंत रोमांचक ठरलेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 113 धावांनी धडाकेबाज विजय संपादन केला. मात्र, जोहान्सबर्गमधील दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेने जोरदार मुसंडी मारत 7 गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. सध्या ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया कसोटी सामन्यातील विजयात एल्गारचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने नाबाद 96 धावांसह संघाला दमदार विजय संपादन करुन दिला. एल्गारची रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन व तेम्बा बवूमा यांच्यासह साकारलेली भागीदारी विशेष महत्त्वाची ठरली. अशाच सांघिक खेळीची त्याला तिसऱया कसोटीत आणखी एकदा अपेक्षा आहे.
‘वांडरर्सवर दुसऱया कसोटी सामन्यात आम्ही अव्वल दर्जाचा खेळ साकारण्यात यशस्वी ठरलो आणि तोच टर्निंग पॉईंट होता. अर्थात, आम्हाला गाफिल राहूनही चालणार नाही. तिसऱया कसोटी सामन्यात आणखी तयारीने मैदानात उतरावे लागेल. तुलनेने आमचा सध्याचा संघ बराच अननुभवी आहे. पण, विजय खेचून आणणे शक्य आहे, हे दुसऱया कसोटीत दिसून आले आहे. केपटाऊनमध्ये वर्चस्व गाजवण्याच्या इराद्यानेच आम्ही मैदानात उतरु’, असे एल्गार पुढे म्हणाला.