प्रतिनिधी /तिसवाडी
गोमंतक भंडारी समाज महिला व तिसवाडी महिला यांच्यातर्फे पणजी येथे भंडारी समाजाच्या कार्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष सुमति चोपडेकर, उर्मिला नाईक, सचिव संध्या पालेकर व तिसवाडी सचिव हेमांगी गोलतकर उपस्थित होते.
सुरुवातीला समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक व उपाध्यक्ष देवानंद नाईक यांनी रूद्रेश्वराच्या फोटोला हार घालून व नंतर इतर मान्यवरांच्या हस्ते समई पेटवून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेमांगी गोलतकर यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच अनुराधा नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रातील पवित्र विद्यादानाचे कार्य करणारे तिसवाडी तालुक्यातील सहा महिला शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भारती विश्वनाथ नाईक (मेरशी), मोहना तुळशिदास नाईक (खोर्ली), प्रिती वायंगणकर (सांताक्रूझ), रोशन प्रकाश कवठणकर (चोडण), सौ. सोनिया सचिन नाईक (सांताक्रूझ), सौ. सुरेखा वांयगणकर (ताळगाव) यांचा समावेश होता. सौ. संध्या पालयेकर यांनी सर्व सत्कारमूर्तींचा परिचय करुन दिला.
अध्यक्ष अशोक नाईक यांनी यावेळी सांगितले की भंडारी समाज सक्षम आहे. आमची कमिटी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहणार आहे. गेल्या 20 वर्षात भंडारी समाजाचे न झालेले काम आम्ही करून दाखविले आहे. गेली 2 वर्षे 6 महिने आम्ही समाजाचे काम करीत आहे. उपाध्यक्ष देवानंद नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गुरू हा अंधाराकडून उजेडाकडे नेणारा दिप आहे. गुरु विना विद्या व्यर्थ आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर महिलांनी पुढे आले पाहिजे.
सत्कारमूर्ती शिक्षिका भारती वि. नाईक व शिक्षिका प्रिती अ. वायंगणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हेमांगी गोलतकर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन सरीता बोरकर यांनी केले