‘सर्च ऑपरेशन’ ठरले अपयशी : फौजफाटा पाहून अरगन तलाव परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
वेळ दुपारी 3.30 ची. रेसकोर्स परिसरात भराभर 200 पोलीस, वन विभागाचे 100 कर्मचारी असा 300 जणांचा ताफा दाखल झाला. सापळे आणि कॅमेरे तर आहेतच. एवढा फौजफाटा पाहून नागरिकांची गर्दीही झाली. ‘ऑपरेशन सर्च’ची तयारी तर जोरात झाली. मात्र तरीही बिबटय़ाने गुंगारा दिलाच आणि ‘सर्च ऑपरेशन’ मोहीम पुन्हा फसली.
पंधरा दिवस होत आले तरी अद्याप रेसकोर्स परिसरातील बिबटय़ाचा शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी पोलीस व वनविभागातर्फे संयुक्तरित्या ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले. 200 पोलीस व त्यांच्या दिमतीला वनविभागाचे 100 कर्मचारी असा 300 जणांचा ताफा बिबटय़ाला शोधण्याचा प्रयत्न करीत होता. संपूर्ण रेसकोर्स परिसर पिंजून काढला तरी शोध लागला नाही. 300 जणांचा ताफा लावूनही बिबटय़ाने गुंगारा दिला.
त्यामुळे ‘ऑपरेशन सर्च’ पूर्णपणे अपयशी ठरले असून, हा केवळ दिखाऊपणा होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिबटय़ा पकडण्यासाठी तज्ञ मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे होते. परंतु ना वन विभागाने, ना पोलीस प्रशासनाने कोणाचा सल्ला घेतला व शुक्रवारी रेसकोर्स परिसरात मोहीम सुरू केली. पोलिसांकडे आत्मसंरक्षणासाठी कोणतेही साधन नसताना केवळ काठीच्या आधारे या ‘सर्च ऑपरेशन’साठी त्यांना जुंपण्यात आले. काही पोलिसांकडे दंगल विरोधी पथकाद्वारे वापरले जाणारे केन शिल्ड व बॉडी प्रोटेक्ट वापरण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? अशाप्रकारे रेसकोर्स परिसरात पोलीस घुसून बिबटय़ा सापडेल का? असा प्रश्न अनेकांकडून व्यक्त होत होता. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा केवळ फोटो व बातम्यांमध्ये झळकण्यासाठी पोलीस व वनविभागाने हे ऑपरेशन राबविल्याचे दिसून आले.
शुक्रवार दि. 5 ऑगस्टपासून जाधवनगर व रेसकोर्स परिसरात बिबटय़ाचा धुडगूस सुरू आहे. केवळ सापळे व कॅमेरे लावण्याव्यतिरिक्त इतर कोणतीही हालचाल वन विभागाकडून केली जात नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत होता. त्यातच शुक्रवारी वनविभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. कोणत्याही तज्ञ व्यक्तीशी चर्चा न करता केवळ दिखाऊपणा करत ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले.
बिबटय़ाचा शोध घेण्यास पोलीस व वनविभागाला अपयश आले. परंतु नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. सायंकाळी 8 नंतर जाधवनगर, रेसकोर्स परिसर, हिंडलगा रोड या परिसरात येताना-जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अधिकारीवर्गाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव वेठीस धरला जात आहे.
ऑपरेशन बिबटय़ा अन् बघ्यांची गर्दी…
जाधवनगर येथील रेसकोर्सच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून 300 हून अधिक पोलीस व वनविभागाचे कर्मचारी यांच्याकडून शोधमोहीम सुरू झाली. ढोल वाजवत, फटाके फोडत शोधमोहीम सुरू होती. यावेळी झालेल्या आवाजामुळे बेळगाव-हिंडलगा मार्गावरून ये-जा करणारे नागरिक आपली वाहने थांबवून ही शोधमोहीम पाहत होते. यामुळे अरगन तलाव परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येकालाच बिबटय़ा सापडला का? याची उत्सुकता लागल्याचे दिसून येत होते.