आजपासून 30 ऑक्टोबरपर्यंत शाळा न उघडण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे यंदा शिक्षण खात्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील सत्र आणि मध्यावधी सुटी रद्द केली होती. मात्र, अलिकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विद्यागम योजनेमुळे कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवार दि. 12 ऑक्टोबरपासून 30 ऑक्टोबरपर्यंत तीन आठवडे शाळांना सुटी जाहीर केली आहे.
शनिवारीच राज्य सरकारने विद्यागम योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. शिक्षकांसह मुलांनाही कोरोनाची बाधा होत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे राज्यातील अनेक शिक्षकांचा बळी गेला आहे. त्यामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत एकूण तीन आठवडे सुटी घोषित करण्याचा आदेश मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला आहे. यापूर्वीच याबाबत संबंधित अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार 12 ते 30 ऑक्टोबरपर्यंत शाळा न उघडण्याचे आदेशपत्रकाद्वारे सर्व शाळांना कळविण्यात आले आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.
गुलबर्गा, दावणगेरे, बेळगाव, कोप्पळ, रायचूरसह अनेक जिल्हय़ात विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच विद्यागम योजनेमुळे अलिकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच विरोधी पक्षनेते, पालकांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य सरकारने या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली होती. आता शिक्षकांनाही तीन आठवडे सुटी जाहीर केली आहे.