संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून अवधी असला तरी आता पासून राजकारण हळूहळू तापू लागले आहे. इच्छुक उमेदवार आपली दावेदारी पेश करू लागले आहेत. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्याकडून प्रभाग निहाय राजकीय स्थितीचा आणि विकास कामांचा आढावा घेत व्यूहरचना केली जात आहे. सक्षम अशा इच्छुक उमेदवारांचीही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राजकीय घडामोडीत आता पक्षांकडून तिकीट मिळविण्यासाठीही इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभागाच्या क्षेत्रात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या विधानसभा मतदार संघ येतात. विशेष म्हणजे या तिन्ही विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी उद्या निवडून आल्यानंतर या तिन्ही काँग्रेस आमदारांकडून निधी मिळण्याची शक्यता दाट असल्याने इच्छुकांचा कल काँग्रेसकडे वाढत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना अपक्षाऐवजी राजकीय पक्षाचे तिकीट मिळाले तर संबंधित उमेदवारांना निवडणूक लढणे सोपे जाते. पक्षाची राजकीय, संघटनात्मक ताकद, नेत्यांचे बळ, आर्थिक पाठबळ मिळते. निवडून आल्यानंतर जर पक्ष राज्यात सत्तेवर असेल, पक्षाचे आमदार असतील तर विकासकामांसाठी निधी मिळणे सोपे होते. सध्या महपालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने विकासकामांसाठी आमदार, खासदारांच्या निधीवर अवलंबून राहावे लागते. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळे राजकीय वातावरण तयार होत आहे.
काँग्रेसच्या तीन आमदारांसह पालकमंत्र्याचा प्रभाव
कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या तिन्ही विधानसभा मतदार संघात अनुक्रमे चंद्रकांत पाटील, ऋतुराज पाटील आणि पी. एन. पाटील काँग्रेसचे आमदार आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवरील काँग्रेसचे आमदार असले तर राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रभावी गृहराज्यमंत्री आणि जिल्हÎाचे पालकमंत्रीही आहेत. काँग्रेसचे नेतृत्वही त्यांच्याकडेच आहे. अशा चार जणांची राजकीय ताकद भविष्यात निधी मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, या राजकीय दूरदृष्टीतून अनेक इच्छुक काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी नेत्यांपर्यंत पोहचण्यासाठी तशी फिल्डिंगही लावण्यास प्रारंभ केला आहे.
भाजप-ताराराणीच्या नाराज माजी नगरसेवकांची चाचपणी
फडणवीस सरकारच्या काळात चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असताना जादा निधी न मिळाल्याने भाजप-ताराराणीचे काही माजी नगरसेवक नाराज आहेत. त्यातील काही जण काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे सहकारी मित्र पक्ष असणाऱया राष्ट्रवादी, शिवसेनेतील माजी नगरसेवक, कार्यकर्ते काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अजिंक्यताऱयाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
प्रा. आसगावकरही काँग्रेसचे चौथे आमदार अन् शहरवासीय
शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर हे देखील काँग्रेसचे आहेत आणि शहरात राहतात. त्यामुळे त्यांच्याकडूनही विकास निधी उपलब्ध होईल, अशीही इच्छुकांना आशा आहे.