शेतकरी आंदोलच्या समर्थनार्थ सिटूचा मेळावा संपन्न
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणून संबोधणाऱ्या रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या राज्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे, मोदी सरकार इतकेच नव्हे तर आमची काळी आई धनदांडगे, भांडवलदारांच्या घशात घालून शेतकऱ्यांना वेठबिगारीस लावणार का ? तीन कृषी काळे कायदे म्हणजे फाशीका फंदा आहे, असा संतप्त सवाल व्यक्त करत कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी सरकारवर आगपाखड केली.
सोमवारी सांय 6 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरण राबविणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशातील शेतकरी युद्ध पुकारलेले आहे. त्या लढाईच्या समर्थनार्थ ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या अध्यक्षतेखाली व सिटूचे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार मेळावा पार पडला.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर म्हणाले की, देशासाठी जीवाची पर्वा न करता पिढ्यानपिढ्या सैन्यात शहीद झाले. अशा काही सैनिक व त्यांचे कुटुंबीय शौर्याची, वीरत्वाची पदके परत करू इच्छिणाऱ्या 5 हजार सैनिकांच्या सहा प्रतिनिधीना तुरुंगात डांबणारे हे निर्दयी निष्ठुर सरकार आम्ही मातीत गाडण्यासाठी शेतकरी सज्ज झाला असून आंदोलन सुरूच राहील. आडम पुढे म्हणाले की, तीन काळे कृषी विधेयक म्हणजे देशातील 80 कोटी जनतेला अन्न सुरक्षा अधिकारापासून वंचित ठेवण्याचा घातकी डाव आहे. साठेबाजी, मनमानी कारभाराला मोकळीक देऊन देश विकू पाहत आहे. हे कदापि आम्ही होऊ देणार असा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सिटू चे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख म्हणाले की, आज भारतातील शेतकरी धान्य, भाजीपाला, फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ शेती व शेतीवरील सहव्यवसाय करतात. त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दीडपट अर्थातच 50 टक्के हमीभाव मागत आहे. पण सरकार आज शेतकऱ्यांना संपवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळावरील नियंत्रण काढून घेण्यासाठी बड्या भांडवलदारांना कर बुडव्यांना विकण्यासाठी आणि आंदण म्हणून देण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची टीका केली.
या कार्यक्रमाची सुरुवात 34 शहिद शेतकऱ्यांना अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी कामगार शेतकरी एकजुटीच्या जोरदार घोषणा देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकाश जाधव, सिटूचे जिल्हा कोषाध्यक्ष दिपक निकंबे, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार, माजी नगरसेविका शेवंताताई देशमुख आदी उपस्थित होते.