सातारा / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील खावली येथे बारामतीला कसे जायचे? अशी विचारणा करत तीन जणांनी व्यापाऱ्यास हाताबुक्क्यांनी मारहाण करत लुटल्याची घटना दि.26 रोजी रात्री 10 वाजता घडली. चोरट्यांनी 3 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.स.394 नुसार त्या तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रशांत नंदकुमार जगदाळे (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या कारमधून दि. 26 राजी सायंकाळी कोरेगाव बाजूकडे निघाले होते. त्यांनी रात्री दहा वाजता गाडी खावलीनजिक थांबवली अन् लघुशंकेला उतरले. त्याच दरम्यान पल्सर दुचाकीवरुन तीन जण आले. त्यांनी बारामतीला कसे जायचे असे विचारुन बोलण्यात गुंतवत ठेवत अचानक मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे अचानक झालेल्या हल्याने ते भयभित झाले. दगडाने आणि बुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या गळय़ातील 1 लाख 45 हजार रुपयांची सोन्याची तीन तोळय़ाची साखळी, 1 हजार रुपयांचे मनगटी घडय़ाळ, 1400 रुपयांचे लेदरचे पॉकेट, त्यामध्ये 1400 रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, 5 हजार रुपयांचा मोबाईल, असे एकूण 3 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.