कोकण पर्यटन महामंडळामार्फत पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यातील समुद्रकिनाऱयावरील 500 घरांमध्ये न्याहारी निवास योजना आखली आहे. या योजनेतून जास्तीत-जास्त पर्यटक कोकणात राहतील. पर्यटन उद्योजकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन आमदार तथा भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले.
रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसऱया एकदिवसीय शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी हिरवळ संस्थेचे किशोर धारिया, मिनल ओक, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, उल्का विश्वासराव, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, ऍड. विलास पाटणे, माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रशांत शिरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते.
या योजनेसाठी तीनही जिल्हा बँकाच्या अध्यक्षांशी चर्चा करून 100 कोटी रुपये देण्याचे ठरले. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उद्योजकांनी पुढे यावे. या माध्यमातून कोकणातील पर्यटनाचा व पर्यायाने कोणचाही विकास होईल , असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार मनोज कोटक म्हणाले, सरकारकडून चांगली गोष्ट करून घ्यायची असेल तरीही दबावगट आवश्यक ठरतो. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे. कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो. इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास, त्यातून रोजगाराच्यादृष्टीने पावले उचलावीत. देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजे.
‘आपलं गाव’ मुंबईतील घराघरात
समुद्रकिनारे साफ करणे हे थोडे कठीण काम आहे. यासाठी जर्मनमधून आयात केलेले एक मशीन आमदार निधी व सीएसआरमधून रत्नागिरीसाठी दिले आहे. अशी आणखी तीन मशीन देण्याचा मानस आमदार लाड यांनी यावेळी व्यक्त केला. निसर्गयात्री संस्थेच्या ‘आपलं गाव’ ऍपची माहिती मुंबईतील प्रत्येकाच्या घरात कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न करू आणि लवकरच याबाबत बैठक बोलावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.