अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र गडद, जिल्हय़ात गुरूवारी जोर मंदावला
प्रतिनिधी/ रत्नागिरी
धुवाँधार कोसणाऱया पावसाचा जोर गुरूवारी सायंकाळपासून ओसरला असला तरी अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अरबी समुद्राच्या दक्षिण क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र गडद झाल्याने शनिवारपासून कोकणात 3 दिवस अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण विभागातील बहुतांश भागात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसाचा प्रत्यय येत आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या या पावसाने अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, गेले चार दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून खेड व राजापुरात गुरूवारी पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्हय़ात रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर या भागात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. जिल्हय़ात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या 24 तासांत एकूण 270 मिमि इतके 30.06 सरासरी पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. तर रत्नागिरी तालुक्यात गेले 2 दिवस धुवाँधार कोसळणाऱया पावसाने काहीशी उसंत घेतल्याने उन्हाचा चटका जाणवत होता. कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर किनारी भागात जोरदार पाऊस कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.