आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय शास्त्रीय संगीताची पताका जगभर फडकविणाऱया संगीतमार्तंड जसराज यांच्या निधनाने एका जसरंगी पर्वाचाच अस्त झाला आहे. जसराज यांचे संपूर्ण जीवन म्हणजे स्वरयज्ञच म्हणता येईल. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी केवळ स्वरांचीच उपासना केली. हरियाणातील एका छोटय़ाशा खेडय़ातून पुढे आलेल्या जसराज यांना घरातच संगीताचे बाळकडू मिळाले. वडिलांच्या निधनानंतर आपल्या वडीलबंधूंसोबत सूरसाधना करणाऱया जसराज यांनी प्रारंभी तबल्याची संगत केली खरी. मात्र, त्यानंतर स्वरसाधना हीच त्यांची जीवनसाधना झाली. मेवाती घराण्याची परंपरा पुढे चालविणाऱया पंडिजींनी अनेक मैफली गाजवल्या. बंदिशी, त्यामधील उत्कटता, भावार्थ उलगडून दाखविण्याचे सामर्थ्य याने त्यांनी संगीताला वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. त्यांनी स्वत: 300 हून अधिक बंदिशी रचल्या. रागातील अंतरंगाची उकल करून त्याला अधिक समृद्ध वा रसमय करण्याची जादू त्यांच्या सूरांमध्ये होती. म्हणूनच रागातील त्यांच्या रसदार शब्दांमुळे शास्त्रीय संगीताला नवा आयाम मिळाला. भक्तिरस हे त्यांच्या गायकीचे अधिष्ठानच होय. तो त्यांच्या गायनातून पाझरत असे. मुळात शास्त्रीय संगीताची वा घराण्याची परंपरा पुढे नेणे एवढय़ापुरते त्यांचे सांगीतिक कार्य मर्यादित नाही. मुळात त्यांनी गायकीत अनेक प्रयोग केले. त्यांच्यातील कलात्मकता, सर्जनशीलताच त्यातून अधोरेखित होते. जसरंगी जुगलबंदी हा त्याचाच आविष्कार होय. ‘मूर्छना’ या प्राचीन संगीत शैलीवर आधारित या जुगलबंदीत एक महिला व पुरुष एकाच वेळी वेगवेगळे राग गात. यातील हे अनोखे रंग त्यांच्यातील वेगळी दृष्टी दाखवून देतात. हवेली संगीताच्या पातळीवरील त्यांचे कामही असेच अजोड म्हणता येईल. हे संगीत तसे मंदिरामधूनच गायले जात असे. किंबहुना, ते शास्त्रीय संगीताच्या मंचावर आणून रसिकप्रिय करण्याचे कार्य जसराज यांनी केले. पं. वसंतराव देशपांडे, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या प्रभावळीतील पं. जसराज यांनी शास्त्रीय संगीत सातासमुद्रापार नेण्याबरोबरच सर्वसामान्यांपर्यंतही पोहोचवले, हा त्यांचा विशेष मानावा लागेल. अमेरिकेत त्यांनी शास्त्रीय गायनाच्या शाळा सुरू केल्या. त्याचबरोबर देश परदेशात सर्वत्र अनेक शिष्य घडविले. त्यांच्या परिसस्पर्शाने अनेकांच्या सांगीतिक आयुष्याला नवे वळण मिळाले. म्हणूनच स्वरगुरु या उपाधीसही ते पात्र ठरतात. दक्षिण धुवावरील अंटार्क्टिका येथे आपला स्वरनाद घुमविणाऱया पंडितजींनी सात द्विपावर आपल्या आवाजाची जादू दाखवली. म्हणूनच नासाकडून शोधण्यात आलेल्या लघुग्रहाला त्यांचे नाव देण्यात आले. ही भारतीयांसाठी एक भूषणावहच घटना म्हणता येईल. संवेदनशील कलाकार हीदेखील त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांनी अनेक माणसे उभी केली. बालपणी संघर्ष करावा लागलेल्या या संगीतसूर्याने कितीतरी जणांना आधार दिला, आपल्या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. प्रतिभा असूनही परिस्थितीअभावी अनेक कलाकार दबले जातात. परंतु, पंडिजींनी अशा उभरत्या वा युवा कलाकारांमधील गुण हेरून त्यांच्या जीवनाला आकार दिला. त्यामुळे माणूस म्हणूनही ते तितकेच उत्तुंग होते, असे दिसते. पंडितजींच्या आयुष्यातील अनेक किस्से वा प्रसंग या दंतकथा बनून राहिल्या आहेत. राग तोडीनंतर मंदिरात प्रकटलेले हरिण, धुलिया मल्हारनंतर झालेली वरुणराजाची बरसात वा कर्करोगाने ग्लानी आलेल्या मुलामध्ये राग दरबारीनंतर आलेली ऊर्जा हा चमत्कार नसून, त्यांच्या गायकीतील उत्कटाविष्कारच म्हणता येईल. पंडितजींचे महाराष्ट्राशीही गहिरे ऋणानुबंध होते. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव आणि जसराज हे आगळेवेगळे समीकरण होते. तेथील त्यांचा उत्साह, गायकी अवर्णनीय असे. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा या त्यांच्या सहचारिणी. त्या अर्थी ते महाराष्ट्राचे जावई. हे नाते त्यांनी अधिक पुढे नेले. या संगीतमार्तंडाने आपला इहलोकीचा प्रवास संपवला असला, तरी यापुढेही त्यांच्या संगीताचे तेजोवलय सबंध संगीतविश्वाला प्रकाश देत राहणार, हे निश्चित आहे. एकीकडे जसराज यांच्यासारख्या पहाडी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलेलो असतानाच निशिकांत कामत यांच्यासारखा प्रतिभावान दिग्दर्शक अभिनेता ऐन पन्नाशीत काळाच्या पडद्याआड जाणे, हेही चटका लावून जाणारे म्हणता येईल. डोंबिवली फास्ट, लई भारी, दृश्यम, मदारी अशा दर्जेदार कलाकृती देणाऱया कामत यांच्याकडे एक प्रकारची कल्पकता होती. समाजाला भिडणारे विषय मोठय़ा सफाईने त्यांनी चित्रपटासारख्या माध्यमातून लोकांपर्यंत परिणामकारकपणे पोचवले. भविष्यातही त्यांच्याकडून वेगळय़ा धाटणीचे चित्रपट आले असते. तत्पूर्वीच त्यांचा अंत होणे म्हणूनच धक्कादायक आहे. भारताचे माजी सलामीवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेतन चौहान यांच्या निधनाचे वृत्तही भारतीय क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकविणारे आहे. महाराष्ट्राच्या रणजी संघातून काही काळ खेळणाऱया आणि कर्णधार सुनील गावसकर यांच्यासोबत सलामी देणाऱया चेतन चौहान यांच्या फलंदाजीत चिवटपणा व चैतन्य याचा मिलाफ होता. या जोडीने 12 वेळा शतकी भागिदारी करीत तीन हजार धावा जोडल्या. कसोटीतील 68 डावांपैकी एकदाही त्यांना शतक ठोकता आले नाही. 80 ते 97 धावांच्या आत ते बाद झाले. मात्र, शतक हुकल्याची खंत त्यांना नसे. संघासाठी खेळणे व क्रिकेटवरील निष्ठा हे त्यांचे वैशिष्टय़ होते. 40 कसोटी व सात वन डे सामान्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या व राजकारणातही छाप सोडलेल्या चेतन चौहान यांची कारकीर्द म्हणूनच चेतनामयच ठरते. पं. जसराज, निशिकांत कामत व चेतन चौहान या तिन्ही कसदार, दमदार शिलेदारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Previous Articleफ्रॉम रशिया विथ लव्ह
Next Article सांगली जिल्ह्यात 22 जणांचा मृत्यू, 311 रूग्ण वाढले
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.