जैतापूर
राजापूर तालुक्यातील दळे येथील आंबा बागेत कामाला असलेल्या तीन नेपाळी कामगारांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेपाळी कामगारांचा मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या तिघांनीही आंबा बागेत फवारणीसाठी वापरण्यात येणारे औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत काम करणाऱया निर्मलसिंग ठाकूरी (38), दीपकराज पूर्णमानसोप (39) आणि गोविंद श्रेष्टा (32) (सर्व राहणार दळे जैतापूर) या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी या तिघांच्याही तब्बेतीत बिघाड झाल्याने त्यांना धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना निर्मलसिंग याचा मृत्यू झाला. तर दीपक व गोविंद यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.
या तिघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्यासह लांजाचे डीवायएसपी श्रीनिवास साळुंखे, राजापूर पोलीस निरीक्षक जर्नादन परबकर, नाटे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस दीपक काळे, चव्हाण आदींनी भेट घेऊन पाहणी केली. तपास नाटे पोलीस करत आहेत.
दरम्यान, आंबा बागेत फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारे जीओ सॉलव्हंट नावाचे औषध प्राशन केल्याने विषबाधा होऊन या तिघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नशेसाठी या तिघांनीही पाण्यातून हे औषध घेतले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या औषधाच्या रिकाम्या बाटल्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.