सैदापुरातील घटनेनंतर नातेवाईकांचे जबाब नोंदवले
प्रतिनिधी/ कराड
सैदापूर (ता. कराड) येथील तीन सख्ख्या बहिणींचा जेवणानंतर उलटय़ा होऊन संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 17 डिसेंबरला उघडकीस आली होती. या मृत मुलींच्या पोस्टमॉर्टेम अहवालासह त्यांनी खाल्लेल्या अन्न घटकांच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. या अहवालानंतरच मृत्यूच्या ठोस कारणापर्यंत पोलिसांना पोहोचता येणे शक्य आहे.
दरम्यान, तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह इतरांचेही जबाब नोंदवले आहेत. जबाब नोंदवण्याचे काम पूर्ण झाले असून आता अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस आहेत. मृत मुलींच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला होता. तो तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आला आहे. अन्य एक अहवाल तपासणीसाठी मिरजेला पाठवला आहे.
सैदापूर येथील सासवे कुटुंबातील आयुषी सासवे (वय 3 वर्षे), आरूषी सासवे (8), आस्था शिवानंद सासवे (9) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. सैदापूर येथे मिलिटरी होस्टेलनजीक शिवानंद सासवे हे कुटुंबासह राहतात. शिवानंद यांना तीन मुली होत्या. तसेच एक मुलगाही आहे. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर रात्री सर्व जण झोपले. मध्यरात्री शिवानंद यांच्या पत्नीसह तिन्ही मुलींना उलटय़ा होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सैदापुरातील खासगी डॉक्टरांकडे नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून औषधे दिली. मात्र बुधवारी पहाटे आयुषी, आरूषी व आस्था या तिघींची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे तिघींना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले. आस्था आणि आयुषी या दोघींचा त्याचदिवशी मृत्यू झाला, तर आरूषीचा 16 डिसेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील तीन मुलींच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही मृत्यूचे ठोस कारण समोर आलेले नाही. यासंदर्भात पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तीन बहिणींच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. तपास सुरू आहे. लवकरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.