प्रतिनिधी /मडगाव
सरकारने 16 हजार लीटर पाणी मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गोव्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, आता निवडणुकीनंतर आलेली पाण्याची भरमसाठ बिले पाहून ग्राहकांची झोप उडाली आहे. ग्राहकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. फातोर्डा येथील एका ग्राहकाला तीन महिन्यांचे 45 हजार रूपयांचे बिल आल्याने त्याला धक्काच बसला आहे.
पाण्याची भरमसाठ बिले येऊ लागल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काल, सोमवारी भरमसाठ बिले आलेल्या ग्राहकांनी मोती डोंगरावरील पाणी पुरवठा विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेण्यासाठी त्यांचे कार्यालय गाठले. मात्र, हे अभियंते बैठकीसाठी बाहेर गेल्याने, त्यांची गाठभेट झाली नाही. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ग्राहकांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.
तीन महिन्यांचे बिल 45 हजार रुपये
पूर्वी ग्राहकांना जेमतेम 500 ते 700 रूपयापर्यंत बिल यायचे, त्या ऐवजी आत्ता सहा ते आठ हजार रूपयांपर्यंत बिले आलेली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. फातोर्डा येथील गुरूदास वेर्लेकर यांना पूर्वी दर महिना तीन ते चार हजार पाण्याचे बिल यायचे. यावेळी तीन महिन्यांचे बिल त्यांना 45 हजार रूपये आलेले आहे. काल त्यांनी बिलाचा अर्धा भरणा केलेला आहे. उर्वरित रक्कम भरणे शक्य नसल्याने नंतर ती भरली जाईल असेही त्यांनी सांगितले.
पाण्याची बिले जिथे 500 ते 700 रूपये पर्यंत यायची, त्यावेळी ती भरणा करताना कुठलेच त्रास होत नव्हते. मात्र, आत्ता सहा ते आठ हजार रूपयांपर्यंत बिले आल्याने त्यांचा भरणा कसा करावा हा प्रश्न उपस्थित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दर महिना बिल देण्याची व्यवस्था करा पाण्याची बिले जानेवारी 2022 ते मार्च 2022 अशी तीन महिन्याची देण्यात आलेली आहेत. त्यामुळे बिलाचा भरणा करणे कठीण होऊन बसलेले आहे. पूर्वी जशी दर महिना बिले दिली जात होती तशाच पद्धतीने ती देण्यात यावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.