वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदला भारतातील 14 दिवसांच्या क्वारन्टाईन कालावधीनंतर आपल्या कुटुंबियांत सामील झाला आहे.
कोरोना महामारी संकटामुळे विश्वनाथन आनंदला जर्मनीत तब्बल तीन महिन्यांचा कालावधीसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये रहावे लागले होते. जर्मनीतून भारतात आगमन झाल्यानंतर विश्वनाथन आनंदला 14 दिवसांच्या क्वारन्टाईनमध्ये रहावे लागले होते. त्याची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यानंतर तो रविवारी आपल्या कुटुंबियांत दाखल झाला. पत्नी अरूणा आणि मुलगा अखिल यांच्यासमवेत आनंद आपला बहुमोल वेळ खर्च करणार आहे.
जर्मनीतून भारतात दाखल झाल्यानंतर आनंदला बेंगळूरमध्ये सात दिवसांच्या कालावधीसाठी क्वारन्टाईनमध्ये रहावे लागले. त्यानंतर सात दिवसांचा उर्वरित कालावधी त्याने आपल्या निवासस्थानी पूर्ण केला. जर्मनीतील भारतीय वकिलात कार्यालयातून केंद्रीय शासनाच्या आदेशानुसार आपल्याला सुखरूपपणे भारतात आणण्यात आले. त्याबद्दल विश्वनाथन आणि त्याची पत्नी अरूणा हिने भारतीय शासनाचे आभार मानले आहेत.
बेंगळूरमधील एका हॉटेलमध्ये आनंदची सात दिवसांच्या कालावधीसाठी निवासाची सोय करण्यात आली होती. गेल्या फेब्रुवारीमध्ये जर्मनीतील बुंदेस्लिगा बुद्धिबळ हंगामात सहभागी होण्यासाठी आनंद जर्मनीला गेला होता पण कोरोना महामारीमुळे जर्मनीतील ही बुद्धिबळ स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आनंदने खबरदारीचा उपाय म्हणून सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्याने आनंदचा जर्मनीतील मुक्काम वाढला होता.