ताज प्रकल्प : वेळागर सर्व्हे क्रमांक 39 बाबत लवकरच बैठक : सुवर्णमध्य न निघाल्यास ठरणार पुढील दिशा
के. जी. गावडे / वेंगुर्ले:
शिरोडा वेळागर येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये गुरुवारी सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अशाच प्रकारचा सामंजस्य करार 30 वर्षांपूर्वीही करण्यात आला होता. मात्र त्याची काहीच कार्यवाही झाली नव्हती. त्यातच वेळागर सर्व्हे नं. 39 मधील तसूभरही जागा देणार नाही, असा निर्धार वेळागर संघर्ष समितीने घेतला आहे. सामंजस्य करार करताना वेळागर संघर्ष समितीला विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे या पंचतारांकित प्रकल्पाबाबत स्थानिकांत साशंकता आहे.
यासंदर्भात वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष व शिरोडा ग्रा. पं. सदस्य अजू अमरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱयावरील 54 हेक्टर जागेत 100 कोटी रुपये खर्च करून पंचतारांकित हॉटेल ताज ग्रुपकडून उभारण्यासाठी सामंजस्य करार राज्य सरकार व ताज गुपमध्ये झाला आहे. असा करार तीस वर्षांपूर्वीही झाला होता. 1992 मध्ये वेळागर येथील जागा संपादित करून पर्यटन मंडळाकडे देण्यात आली. पर्यटन मंडळाने ही जागा ताज ग्रुपला हॉटेल बांधण्यासाठी कराराने दिली होती. मात्र ताज ग्रुपने यावर हॉटेलची उभारणी गेल्या तीस वर्षांत केली नाही. आता पुन्हा 90 वर्षांचा करार करण्यात आला आहे. मग मागील तीस वर्षांचे काय? 120 वर्षांच्या कराराने जागा भाडय़ाने देता येते का? सामंजस्य करार करताना वेळागर सर्व्हे नं. 39 मधील भूमिपुत्रांना व वेळागर संघर्ष समितीला विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही.
स्थानिकांच्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष
शिरोडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी वेळागर सर्व्हे नं. 39 ला अद्याप भेट दिलेली नाही की वेळागरवासीयांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. करार करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी येथील भूमिपूत्रांना विश्व्रासात घेणे आवश्यक होते. वेळागरवासीयांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदने दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून स्थानिक भूमिपूत्रांना विश्वासात न घेता सामंजस्य करार करण्यात आला. पंचतारांकित हॉटेल येथे होण्यास आमचा विरोध नाही. मात्र वेळागर सर्व्हे न. 39 वगळून ते झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सर्व्हे क्र. 39 ला दिली स्थगिती
वेळागर संघर्ष समितीचे नेते व विद्यमान सल्लागार जयप्रकाश चमणकर म्हणाले, शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी एम. टी. डी. सी. मार्फत ताज ग्रुपने 30 वर्षांपूर्वी साठ एकर जागेची मागणी केली. स्थानिक भूमिपत्रांनी आपल्या भागात मोठा प्रकल्प होत असल्याने व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱया मिळतील म्हणून सहमती दिली. मात्र जमिनीचा दर 200 रुपये गुंठा एवढा अत्यल्प असल्याने बऱयाच भूमिपूत्रांची नाराजी होती. हा प्रकल्प तथा पंचतारांकित हॉटेल समूह तीन वर्षांत सुरू करण्याचे अभिवचन त्यावेळी ताजतर्फे देण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात 60 ऐवजी 100 एकर जमीन व त्या नंतर गावठाण असलेल्या सर्व्हे नं. 39 सह 138 एकरची मागणी ताज ग्रुपने केली. त्याला स्थानिक भूमिपूत्रांनी विरोध केला. वास्तविक ताब्यात असलेल्या 60 एकर क्षेत्रात विकासात्मक काहीही केले नाही. उलटपक्षी अधिक जमिनीची मागणी सुरू केली. त्यामुळे स्थानिक भूमिपूत्रांनी सर्व्हे न. 39 देण्यास स्पष्टपणे विरोध केला. वेळागर संघर्ष समिती स्थापन केली. त्यानंतर जनतेकडून मोर्चा, आंदोलनांबरोबरच न्यायालयीन संघर्ष सुरू झाला. जमीन हस्तांतरण प्रक्रियेस स्थानिक भूमिपूत्रांनी जोरदार विरोध केला. शासनामार्फत त्यावेळी अमानूष लाठीमार झाला. आपल्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ जखमी झाले. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. व या लढय़ाला सर्वत्र पाठिंबा मिळाला. सुप्रिम कोर्टापर्यंत ही केस चालली व न्यायालयाच्या आदेशानंतर पुनश्च चर्चा निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडे आले. तत्कालिन महसूलमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा प्रकल्प सर्व्हे नं. 39 मध्ये करण्यास स्थगिती दिली.
सुवर्णमध्ये न निघाल्यास लवकरच पुढील दिशा
जयप्रकाश चमणकर म्हणाले, अत्यल्प दराने महाराष्ट्र शासनाने एमटीडीसीमार्फत घेतलेल्या या जमिनीत जे क्षेत्र आज ताज ग्रुपच्या ताब्यात आहे, तेच 100 एकर आहे. तरीही त्यांनी त्या क्षेत्रात 30 वर्षांत काहीही केले नाही. उलटपक्षी स्थानिक भूमिपूत्रांनी गेल्या चार/पाच वर्षांत केंद्र सरकारच्या निवास न्याहारी योजनेस अनुसरून तंबू उभारून पर्यटन सुरू केले आहे. त्याला सर्वत्र चांगला सहभाग मिळाला. मात्र ताज ग्रुपने 30 वर्षांत काहीही केले नाही. त्यामुळे स्थानिक भूमिपूत्रांनी ताजच्या ताब्यात असलेली जमीन परत करावी, अशी मागणी केली आहे. सर्व्हे नं. 39 हे गावठाण क्षेत्र असल्याने ते वगळून पंचतारांकित प्रकल्प करण्यास आमचा विरोध नाही. या संदर्भात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सुवर्णमध्य न निघाल्यास पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.